सांगली : संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांनी शिवरायांचा इतिहास विकृत करुन मांडला आणि त्यांचाच कोरेगाव-भीमा इथल्या हिंसाचारामागे हात आहे, अशा शब्दात संभाजी भिडे गुरुजी यांनी आरोप केले आहेत. सांगलीमध्ये एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. काही जणांचा अमृतात माती कालवणे हा कायमचाच खटाटोप असतो. सगळा इतिहास बिघडवून सांगणे हे त्यांचे काम आहेत. जे घडले ते सर्व आश्चर्यजनक होते. यामध्ये शिवप्रतिष्ठानचा अजिबात हात नाही. प्रकाश आंबेडकर हे कुणीतरी सांगितलेले बोलत आहेत. त्यांचा बोलविता धनी कुणी तरी वेगळाच आहे. या संपूर्ण घटनेबाबत त्यांना फार काहीच माहित नाही, असा गंभीर आरोप भिडे गुरुजींनी या मुलाखतीत केला.
शरद पवार हे धुरंधर नेते
भिडे गुरुजींनी त्यांच्यावर नाव न घेता आरोप करणारे ज्येष्ठ नेते शरद पवारांबाबतही मार्मिक शब्दात टिप्पणी केली. शरद पवार सत्तेत नाहीत. शरद पवार हे अत्यंत विवेकी, बुद्धीवान आणि अतिशय धुरंधर नेते आहेत. ते असे काही करणार नाहीत याची मला खात्री आहे. पण मराठा मोर्चा, लिंगायतांचा स्वतंत्र धर्म, कर्जमाफी यामागे निसंशय: राजकारणी लोक आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
अॅट्रॉसिटीबाबात पुनर्विचार करावा
आपण एकदा प्रयोग करुन बघू. अॅट्रॉसिटी कायदा गेली 70 वर्ष सुरु आहे. तो रद्द करायचा आणि पुढे 35 वर्षात काय होते ते बघायचे. त्याचे परिणाम काय होतात ते आपल्याला समजेल. कोणतीही गोष्ट सत्य आहे की नाही हे ट्रायल अॅण्ड एरर मेथडने पाहिले जाते. हा कायदा थेट नामशेष करावा, असे माझे म्हणणे नाही. पण लोकसभा, राज्यसभेत त्यावर चर्चा व्हावी आणि मग त्यावर काही ते निर्णय घ्यावे, असे माझे मत आहेे.
गुणवत्तेच्या आधारावर आरक्षण द्यावे
भिडे यांनी आरक्षणाबाबतही मत व्यक्त केले. देशात गुणवत्तेला आरक्षण देणे गरजेचे आहे. कारण तसे आरक्षण दिल्यास देशाचे कल्याण होईल. आर्थिक आरक्षणाबाबत काय सुरु आहे हे आपण पाहतोच आहे. त्यामुळे देशात गुणवत्तेच्या आधारावर आरक्षण दिले गेले पाहिजे. वढू गावातील गोविंद गोपाळ यांच्या समाधीबाबत भिडे म्हणाले, गोविंद गोपाळ यांच्या समाधीबाबत फार काही माहित नाही. मला त्या इतिहासाबद्दल शून्य माहिती आहे. मी तिथे फक्त संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीचे दर्शन घेतो.