आ. जिग्नेश मेवाणींचे आव्हान
नवी दिल्ली : पुण्यातील शनिवार वाड्यावरील एल्गार परिषदेतील माझ्या भाषणात एकही प्रक्षोभक शब्द नव्हता. मात्र, तरीही भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर मला आणि दलित समाजाला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर दलित समाज 2019 च्या निवडणुकीत तुम्हाला चांगलाच धडा शिकवेल, अशा इशारा गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याने मेवाणी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मोदींनाच आव्हान दिले. मला एकदा पंतप्रधानांना भेटायचे आहे. त्यांना भेटायला जाताना मी मनुस्मृती आणि संविधानाची प्रत घेऊन जाईन. या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांसमोर ठेवल्यानंतर ते मनुस्मृती आणि संविधान यापैकी काय निवडतात, हे मला पाहायचे आहे, असे जिग्नेश म्हणाले.
माझी प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न
आमदार जिग्नेश मेवाणी म्हणाले, पंतप्रधान मोदी अजूनही भीमा कोरेगावच्या मुद्द्यावर मौन बाळगून का आहेत? मोदी पंतप्रधानपदी आल्यापासूनच देशामध्ये दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्यांचे गुजरात मॉडेल हे शेतकरी आणि मजुरांना लक्ष्य करणारे आहे. सध्या संघ परिवार आणि भाजपाचे लोक बालिश आरोप करून माझी प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत. गुजरातमधील निकालामुळे हे घडत आहे. त्यामुळे कदाचित त्यांना 2019 सालच्या लोकसभा निवडणुकांची भीती वाटत असावी, असा टोलाही जिग्नेश यांनी लगावला. मी कधीही भीमा कोरेगावला गेलेलो नाही, असेही मेवाणी म्हणाले.
देश कॅशलेस होण्याआधी कास्टलेस करा
देशातून जातीयवादाचे समूळ उच्चाटन व्हावे, सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत व्हावी, हाच आमचा हेतू आहे. त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठीच 9 तारखेला युवा हुंकार रॅली काढणार आहोत. सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी मी रस्त्यावर उतरत असेन तर त्याला विरोध होण्याचा काही प्रश्न नाही. देश कॅशलेस होण्याआधी कास्टलेस होण्याची गरज आहे. आम्ही कोरेगाव भीमाला गेलो नाही आणि मुंबईतील कालच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतरही शांत राहिलो. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत. दलित बांधवांनाही मी शांतता राखण्याचे आवाहन करतो. जाती-जातींमध्ये, धर्मांमध्ये फूट पाडण्याचा भाजप आणि संघाचा अजेंडा आहे. तेच अशा पद्धतीने हिंसाचार भडकवत आहेत, असे मेवाणी म्हणाले
मेवाणी, खालिद यांच्याविरूद्ध तक्रार
31 डिसेंबर रोजी शनिवार वाड्याच्या इथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमर खालिद व जिग्नेश मेवाणी सहभागी झाले होते. उमरने भीमा कोरगाव लढाईला भविष्यात पुन्हा निर्माण करू शकतो, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तसेच, नवीन पेशवाईला संपवणे हीच भीमा कोरेगावच्या शहिदांना श्रद्धांजली ठरेल असेही उमर म्हणाल्याची फिर्याद आहे. यावेळी बोलताना जिग्नेश मेवाणी याने हा संघर्ष पुढे न्यायचा असेल तर केवळ निवडणुकांचे राजकारण पुरेसे नाही, विधानसभेत व संसदेत तर जनतेची लढाई लढणारे हवेतच मात्र, जातिनिर्मूलनाची लढाई रस्त्यावरच करावी लागेल, असे वक्तव्य केल्याची फिर्याद आहे. एका वर्गाचे दुसर्या वर्गावर शासन असून ते रस्त्यावरच्या लढाईतच संपुष्टात येईल, असे जिग्नेश म्हणाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.