जळगाव । जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या नावाने जिल्ह्यातील 46 जणांना बनावट नियुक्तीपत्रे दिल्या प्रकरणी दोन कर्मचार्यांवर शहर पोलिस ठाण्यात 4 मार्च रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर दुसर्या संशयिताने अतिरीक्त सत्र न्यायाधीश आर. जे. कटारीया यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे बुधवारी खुलासा सादर केला आहे.
दोघांविरूध्द गुन्हा दाखल – नोकरीचे आमीष दाखवून जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वर्ग 4 च्या 46 पदांची बनावट नियुक्तीपत्रे तयार करुन प्रत्येकाकडून सुमारे 1 लाख ते 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंतची रक्कम तीन वर्षापूर्वीच उकळण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी राजू भोजू भोई आणि सुभाष भिकन मिस्तरी या दोन्ही कर्मचार्यांना निलंबित केले. तर 4 मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होतो.
या प्रकरणी 6 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्याला नेरीनाका परिसरातून राजू भोई याला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर या प्रकरणातील दुसरा संशयित सुभाष मिस्तरी याने अतिरीक्त सत्र न्यायाधीश कटारीया यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सरकारतर्फे केतन ढाके यांनी खुलासा सादर केला. त्यात मिस्तरी याला जामीन देण्यास विरोध केला आहे.
चोरट्यांना 18 पर्यंत कोठडी
जळगाव- गोलाणी मार्केट परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची काच फोडून भुसावळच्या नगरसेवकाचे साडेतीन लाख रुपये लांबवल्याची घटना 10 मार्च रोजी घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी हाड्या उर्फ विकास राजू गुमाने(वय 23, रा. कंजरवाडा ), टारझन उर्फ बल्लू अरूण दहेकर (वय 30, दोन्ही रा. कंजरवाडा) याला अटक केली.
त्यांना बुधवारी न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 18 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारतर्फे अॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.