सफाई ठेक्यात भागीदारीचा भाजपा नगरसेवकांवर आरोप, अनेक भागात अस्वच्छता
जळगाव । जळगाव शहरातील सफाईच्या ठेक्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या 7 ते 8 नगरसेवकांची भागीदारी असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी केला आहे. ठेकेदाराकडून अटीशर्तींचा भंग होत असतानाही अधिकारी आणि पदाधिकारी मूग गिळून गप्प का? ठेकेदाराला बिले देण्याची घाई का? असा सवालदेखील बरडे यांनी उपस्थित केला आहे.
महापालिका प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून जळगाव शहरातील सफाईचा ठेका वॉटरग्रेसला दिला आहे. परंतु, शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डेंग्यू आणि साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. साफसफाई होत नसतानाही केवळ राजकीय अभय असल्यामुळे ठेकेदाराची मनमानी सुरू असल्याचा आरोप नितीन बरडे यांनी केला आहे. साफसफाईसाठी यंत्रणा पुरविण्याचे काम ठेकेदाराचे असतानाही महानगरपालिकेचे 8 ट्रॅक्टर, 2 लोडर, 2 जेसीबीचा वापर ठेकेदार करीत आहे. चालकदेखील महापालिकेचेच असून, डिझेल खर्चही प्रशासन करीत असल्याचा आरोपही बरडे यांनी केला.