सत्तास्थापने नंतर भाजपचा खोटेपणा उघड करू: सोनिया गांधी

0

नवी दिल्ली: गेल्या एक महिन्यापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु होता. सत्तास्थापन करण्याचा मार्ग मोकळा होत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस मिळून सरकार स्थापन करत आहेत. या सत्तासंघर्षावरून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून भाजपचा खोटेपणा उघड करू, असं त्या म्हणाल्या. भाजपनं सत्तेसाठी केलेलं कृत्य लज्जास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आज, गुरुवारी झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध मुद्द्यांवरून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भाजपाने महाराष्ट्रातील लोकशाही नष्ट करण्याचे केलेले प्रयत्न लज्जास्पद होते, असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपच्या इशाऱ्यावर काम केलं. भाजपचं हे कृत्य लज्जास्पद आहे. महाविकास आघाडी तोडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, असंही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि शिवसेनेनं राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावरच राज्यपालांनी काम केलं यात शंकाच नाही, असं त्या म्हणाल्या. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडीचं सरकार येण्यापासून रोखण्याचे सगळे प्रयत्न केले गेले. आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि मोदी-शहा सरकारचा पर्दाफाश झाला, असंही त्या म्हणाल्या. अहंकार आणि अतिआत्मविश्वासामुळं भाजपची इतर पक्षांसोबत असलेली निवडणूकपूर्व आघाडी टिकली नाही असं सांगत भाजपनं अनेक मित्र गमावले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.