सदाभाऊंचा फ्लॉप शो

0

अकोला : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शुक्रवारी अकोला जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. या दौर्‍यात शेतकरी समस्या निवारण मेळावा त्यांनी घेतला. मात्र, या मेळाव्याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवल्याने सदाभाऊंची चांगलीच गोची झाली. दिवसभर या फ्लॉप शोची चर्चा अकोल्यात झडत होती. सदाभाऊंच्या रयत संघटनेच्या वतीने मूर्तीजापूर तालुक्यातील कानडी येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती सावरली
याच मेळाव्यात सदाभाऊंनी भीमा-कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची जोरदार पाठराखण केली. ही परिस्थिती हाताळण्यास मुख्यमंत्री अपयशी ठरल्याची टीका होत असताना खोतांनी फडणवीसांच्या बाजूने किल्ला लढवत मुख्यमंत्र्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती सावरण्यासाठी योग्य पावले उचलल्याचे खोत म्हणाले. सभेनंतर पत्रकारांशी बोलताना भीमा-कोरेगाव प्रकरणामागे भाजपचा हात असल्याचा आरोप करणार्‍या स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांवर टीका केली. तुपकर हे नेहमीच चर्चेत राहण्याससाठी भडक वक्तव्य करतात. त्यांची राजकीय ऊंची मोठी नाही, असे म्हणत त्यांनी तुपकरांची ऊंची मोजली. पारावर गावगप्पा करणार्‍यांच्या वक्तव्याला काय अर्थ आहे, अशा खोचक शब्दात खोत यांनी तुपकरांवर टीका केली.

विरोधकांकडे मुद्दा नाही
भाजप सरकारने यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने दिली नव्हती, त्यापेक्षा अधिक कर्जमाफी शेतकर्‍यांना दिली आहे. विरोधकांच्या हातात कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते उठसूठ सरकारवर टीका करत आहेत, असे सदाभाऊ म्हणाले.