सदिच्छा हेतूने 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका

0

नवी दिल्ली । पाकिस्तानकडून सीमा भागात सातत्याने दगाबाजी सुरू असताना भारत सरकार सोमवारी सदिच्छा हेतूने 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका केली आहे. कझाकिस्तान येथे शांघाय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यामध्ये झालेल्या अनौपचारिक भेटीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात कझाकिस्तानमध्ये भेट झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर संमेलनाच्या आधी दोन्ही नेत्यांनी लीडर्स लाऊंजमध्ये एकमेकांना अभिवादन केले.

शिक्षा भोगून पूर्ण झाल्यामुळे पाकिस्तानने केली मागणी
या कैद्यांनी त्यांची शिक्षा भोगून पूर्ण केलेली असल्यामुळे पाकिस्तानने त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर भारताकडून प्रथमच अशा प्रकारे कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. अस्ताना येथे झालेल्या मोदी-शरीफ भेटीनंतर हा निर्णय झाल्याने या कैद्यांच्या सुटकेला एक वेगळे महत्त्व आहे. नवाज शरीफ यांच्या शस्त्रक्रियेनंतर प्रथमच या दोन नेत्यांची भेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी शरीफ आणि त्यांच्या आईच्या तब्येतीचीही विचारपूस केली.

नुकतीच दोन मुलांची सुटका
मागच्याच आठवड्यात भारताने अली रझा (11) आणि बाबर (10) या दोन लहान मुलांना पाकिस्तानच्या ताब्यात सोपवले. ही दोन्ही मुले चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीत आली होती. त्यांचे काका मोहम्मद शहजादही त्यांच्यासोबत होते. भारताने दोन्ही लहान मुलांची सुटका केली पण मोहम्मद शहजाद यांना मात्र सोडलेले नाही. खरतर एप्रिल महिन्यातच या दोन मुलांची सुटका होणार होती. पण कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने भारताने आपला निर्णय बदलला.

मानवतेने सुटका
आम्ही मानवतेच्या आधारावर कैद्यांची सुटका करत आहोत. त्याचा अन्य कशाशीही संबंध जोडू नये, असे भारतीय अधिकार्‍यांनी म्हटले आहे. पाकिस्तानही त्यांच्या ताब्यातील भारतीय कैद्यांची सुटका करेल अशी सरकारला अपेक्षा आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार 132 भारतीय कैदी पाकिस्तानी तुरुंगात असून त्यातील 57 कैद्यांची शिक्षा भोगून पूर्ण झाली आहे.