सनातन संस्थेवर बंदी घालण्याची विरोधकांची मागणी 

0
आमदार आसिफ शेख यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरण 
सरकारवर वैचारिक दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप 
मुंबई: मालेगावचे काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना जीवे मारण्याची धमकी देणारे आरोपी अजून मोकाट कसे? असा प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकार वैचारिक दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी काय कारवाई केली? असा सवाल केला. आ. आसिफ शेख यांना नुकतीच फेसबुक व युट्यूबवर व्हीडीओ अपलोड करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे पुराव्यांसह तक्रार देखील केली होती. परंतु, आरोपींना अद्यापही अटक झाली नसल्यासंदर्भात आ. शेख यांनी गुरुवारी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले होते.
यावर बोलताना विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, आ. आसिफ शेख यांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याची नाशिक क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती होती. माझेही पोलीस अधिक्षकांशी बोलणे झाले होते. परंतु, आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे ते म्हणाले. वैचारिक दहशतवादाकडे सरकार डोळेझाक करते आहे. सनातन सारख्या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळेच वैचारिक कट्टरवाद्यांची हिंमत वाढली असून, आमदारांनाही धमक्या दिल्या जात आहेत. सनातनविरूद्ध बोलतो म्हणून माझ्याविरूद्ध गोव्याच्या फोंडा न्यायालयात 10 कोटी रूपयांचा दावा ठोकण्यात आला आहे. मी सनातनविरोधात बोलू नये म्हणून मला धमकावण्याचा प्रयत्न झालेला आहे, असेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  महाराष्ट्र सरकारने सनातन संस्थेवर बंदीसाठी काय कारवाई केली? असा सवाल करत सनातनवर बंदी घालण्यासाठी २०११ साली केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. दाभोलकर, पानसरे यांची हत्या झाली असल्याचे सांगत या वृत्तीला कुणाचा आशीर्वाद आहे आणि अशा किती खुनाची वाट बघताय? असा सवाल चव्हाण यांनी सरकारला केला.