स्थायी समिती सभेत विष्णू भंगाळे,नितीन बरडे यांचा गौप्यस्फोट : दर आठवड्याला सभा होणार
जळगाव- शहरातील साफसफाईसाठी वॉटरग्रेसला ठेका दिला आहे.मात्र कचरा उचलला जात नाही.केवळ माती टाकून वजन वाढवित असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी केला.तर एका डंपरची चार टन क्षमता असतानांही सरासरी 9 टन कचरा असल्याची नोंद केली जात असून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा गौप्यस्फोट नितिन बरडे यांनी केला.दरम्यान,सफाईचा एकमुस्त ठेका रद्द करावा अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली आ
मनपा स्थायी समितीची सभा सभापती अॅड.शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ.उदय टेकाळे,उपायुक्त डॉ.उत्कर्ष गुठ्ठे,अजित मुठे,मिनीनाथ दंडवते,मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुले,नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व 9 विषयांना मंजूरी देण्यात आली. स्थायी समितीची सभा आठवड्यातून दर शुक्रवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच सभा झाल्यानंतर 24 तासात ठराव लिहून कार्यवाही करण्याचे आदेश सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी दिले.
31 सुरक्षा रक्षक नेमण्यास मंजुरी
मनपा निधीअंतर्गत मनपाच्या मिळकतींवर सुरक्षा रक्षक नेमणुकीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. यावेळी सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी मेहरुण तलावावर तीन शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक असायला हवे अशी उपसूचना मांडली.मनपाच्या बगीच्यांमध्ये सुरक्षा रक्षक नेमावे अशी शिफारस नवनाथ दारकुंडे यांनी केली.मेहरुण तलावावर सुरक्षा रक्षक पट्टीचा पोहणारा असावा असे विष्णू भंगाळे यांनी सांगितले.सुरक्षा रक्षक असल्यास मेहरुण तलावाचे सौंदर्य अबाधित राहतील असे राजेंद्र घुगे-पाटील यांनी सांगितले.तर भगत बालाणी यांनी लाईफ गार्ड नेमावे अशी मागणी केली.
पर्यायी मार्ग नसल्याने शिवाजीनगरातील नागरिकांची गैरसोय
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.मात्र अद्यापही पर्यायी मार्ग केलेला नाही.त्यामुळे शिवाजीनगरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी निदर्शनास आणून दिले.पर्यायी मार्ग नसल्याने नागरिक रेल्वेस्थानकाच्या दादर्याचा वापर करतात.त्याबाबत परवानगी देखील दिली आहे.तरीही विनातिकिट म्हणून नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाला पत्र देण्याची मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली.
भंगाळेंनी उपायुक्तांसह आरोग्य अधिकार्यांना धरले धारेवर
शहरात साफसफाई होत नाही.घंटागाडी येत नाही.मार्केट परिसरात कचरा उचलला जात नसल्याची नाराजी व्यक्त करत विष्णू भंगाळे यांनी उपायुक्त मिनिनाथ दंडवते आणि आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना धारेवर धरले.ठेकेदार आणि अधिकार्यांकडून आडमुठे धोरण सुरु असून कचर्यात माती टाकून वजन वाढविल्या जात असल्याचा आरोप भंगाळे यांनी केला.
ओव्हरलोडची परिवहन विभागाकडे तक्रार करणार-बरडे
कचरा संकलनासाठी लावण्यात आलेल्या डंपरची क्षमता पाच टनाची आहे.तर मग 9 टन कचरा कसे काय भरले जाते असा सवाल उपस्थित करुन ठेकेदार लाखो रुपयाचा गैरव्यवहार करीत असल्याचा गौप्यस्फोट नितीन बरडे यांनी केला.तसेच कचर्याची ओव्हरलोड वाहतूक करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांसह परिवहन विभागाकडे करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला.