‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर मानमरातब दिला

द्वारकाई व्याख्यानमाला : यवतमाळचे गझलकार आबीद शेख यांची भावोद्गार; गझलांतून दिला मानवतेचा संदेश

भुसावळ : जीवाला जीव लावणारी माणसं गझलेने जोडली गेली. महाराष्ट्रच नव्हे, देशभर मानमरातब मिळाला. दोन ओळींचा शेर रसिकांच्या काळजाला भिडल्यावर जेव्हा त्यांचा हुंदका दाटून येतो तेव्हा जो आनंद मिळतो तो शब्दातीत असतो. ‘सुगंधी बाग आहे ती तिला माहितीही नाही’ आणि ‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे’ या दोन गझलांनी नवी ओळख दिली, अशी भावना यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील गझलकार आबीद मन्सूर शेख यांनी व्यक्त केली. भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ ऑनलाईन व्याख्यानमाला घेण्यात आली. त्यात गुरुवारी ‘अशी बहरली माझी गझल’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यांची होती प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून जय गणेश स्पोर्ट्स क्लबचे कार्याध्यक्ष चैत्राम पवार हे होते. कबड्डीमहर्षी स्वर्गीय अरुण मांडळकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष होते. कविता व गझल विषयाला हे वर्ष समर्पित करण्यात आले, असे समन्वयक गणेश फेगडे यांनी सूत्रसंचलनातून सांगितले. तंत्रसहाय्य बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गिरीश कोळी यांचे लाभले. समारोप सत्रात धरणगावचे साहित्य प्रा.बी.एन.चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. ‘भुसावळच्या सांस्कृतिक चळवळ प्रवाहीत ठेवण्यासाठी द्वारकाई व्याख्यानमाला प्रेरक आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

गझलांतून कोसळला आठवणींचा पाऊस
आबीद शेख यांनी ‘आग जाती उरी लावूनी चांदण्या, याद येते तुझी पाहुनी चांदण्या’ ही गझल सर्वप्रथम सादर करून तरुणाईच्या हृदयाचा ताबा घेतला. त्यानंतर ‘उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, हे ध्येय काय आहे थांबायचे बहाणे’ ही गझल सादर केली. ‘नाटकांची गझल केली, गझलेचे नाटक नाही केले’ असे सांगताना त्यांनी लेखनप्रवास उलगडला. अमरावतीत ‘मी फेडले अखेरी उपकार खंजीराचे, माझेच रक्त आहे शोभणार खंजीराचे’ या गझलेला जी दाद मिळाली ती हुरुप वाढवणारी होती, असे ते म्हणाले.

…अन् महाराष्ट्राने डोक्यावर घेतले
अखिल भारतीय साहित्य संमेलनात ‘तरन्नूम’ प्रकारात ‘सुगंधी बाग आहे ती तिला माहीत ही नाही, तिच्या श्वासापदरी दरवळ जुई-जाईतही नाही’ व ‘समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे’ या दोन गझलांना रसिकांची दाद मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या ओठावर या गझला आल्या. ‘सुंगधी बाग आहे ती’ मधील ‘नका शोधू मला कुठे आता प्रेमात आहे मी, कुण्या धर्मात ही नाही कुण्या जातीत ही नाही’ हा शेर मानवतेचा संदेश देणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वाचले ना चाळले त्यांनी मला…
‘वाचले ना चाळले त्यांनी मला, बघ कसे चुरगाळले त्यांनी मला’ या दोन ओळीत त्यांनी समाजाची वेदना मांडली. त्यानंतर ‘खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी, यासाठी जाळले त्यांनी मला’ या ओळीतून जाज्वल्य असा क्रांतीकारी विचार मांडला. ‘समजू नका ढगा’ या गझलेतील ‘ते सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही, विश्वासघात केला शाळेत पुस्तकाने’ या शेरातून त्यांनी अस्वस्था भारताचे वर्तमान मांडले. सामाजिक विषमतेची दरी अजूही कमी झालेली नाही हे शल्य त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला.

भीमराव पांचाळेंचे प्रेम लाभले
गझलसम्राट भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या अनेक कार्यक्रमात माझ्या गझला सादर केल्या. त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. वेळोवेळी त्यांनी जे प्रेम दिले ते लिखाणासाठी बळ देणारे ठरले. ऑनलाईन का असेना पण भुसावळची सृजनात्मक रसिकता अनुभवता आली. साहित्यावर प्रेम करणारी माणसं भेटतात तेव्हा हा प्रांत सदाबहार असल्याची प्रचिती येते, असेही गझलकार आबीद शेख समारोपप्रसंगी म्हणाले.