जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या समांतर रस्त्याचे काम करण्यात यावे या मागणीसाठी १०० दिवसांच्या साखळी उपोषणास आज गुरुवारपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरुवात झाली. या वेळी डीपीआर मंजुरीची प्रत मिळत नाही व कामाची निविदा मंजूर होत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण मागे न घेण्याचा निर्धार समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने करण्यात आला.
१०-१० दिवसांच्या १० टप्प्यात १०० दिवस हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कांताई सभागृहाच्या परिसरात खुली चर्चा व बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्यानुसार या उपोषणास सुरुवात झाली. या वेळी उपोषण प्रसंगी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह कृती समितीचे दिलीप तिवारी, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नगरसेवक अमर जैन, शिरीश बर्वे, फारुक शेख, अनंत जोशी, गजानन मालपुरे, सुशील नवाल, नितीन रेदसनी, विराज कावडिया, अमित जगताप, आशराफ पिंजारी, मंगला बारी, शोभा चौधरी, सरिता माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी, शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.