मुंबई : मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग अर्थात समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. केवळ औपचारिक घोषणा शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपने या महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
समृद्धी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काही आमदारांसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तेव्हाच महामार्गाच्या नामांतरावरुन युतीत वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली होती.
देशातील पहिल्या वहिल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही बाळासाहेब ठाकरेंनी रोवली होती. त्यांच्या योगदानाचा आणि दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती.