मुंबई:- राज्यातील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जळगाव येथे रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८२ वर्षीय करोनाबाधित वृद्धेचा मृतदेह सहा दिवसांनी बुधवारी सकाळी रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आला. या घटनेमुळे करोनाग्रस्तांची देखभाल करणाऱ्या आरोग्य विभागावर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांना या घटनेवरुन सरकारचा ढिसाळ कारभार चालू असतांना आपण कसे शांत बसून राहणार असा सवाल उपस्थित केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी या घटनेवरून हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या काळात माध्यमांमध्ये रोज कोरोनासंबंधी बातम्या येत आहेत. काही सकारात्मक तर काही नकारात्मक. पण काल एक बातमी माझ्या वाचनात आली आणि मन सुन्न झालं. जळगाव येथील रुग्णालयात करोना पॉझिटिव्ह असलेल्या एका वृद्ध महिलेला दाखल करण्यात आलं होतं. ती वृद्ध महिला आठ दिवसांपासून रुग्णालयातून हरवली होती. आठ दिवसांनी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रुग्णालयाशेजारीच सापडला. काही दिवसांपूर्वी याच मुलाची आई करोनामुळेच दगावली. परमेश्वराने इतकं निष्ठुर कधी होऊ नये. अशी वेळ कधीच कोणत्या शत्रूवरदेखील येऊ नये”.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून विचार केला तर या गोष्टीबद्दल प्रचंड दु:ख आणि संताप वाटतो. राज्य सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण कसं शांत बसून राहणार? आवाज उठवायलाच हवा. मी त्या मुलाच्या दु:खात सहभागी आहे”.