सरकारने लोकांच्या माथी मारली उज्वला योजना

0

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप; फसव्या योजनेविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा

मुंबई – सरकारकडून चालविली जाणारी उज्वला योजना लोकांच्या माथी मारण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. पंतप्रधान उज्वला योजना लोकांना परवडत नसल्याने लोकांना पुन्हा चुलीवर यावे लागत आहे. सरकारची ही योजनासुध्दा फसवी असल्याची टिकादेखील त्यांनी यावेळी केली. यावेळी वाघ यांनी या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना होत नसल्याचे वास्तव मांडणारी चित्रफित दाखविली.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आपल्याला रोज नवनवीन घोषणा ऐकायला मिळत असून त्याचा फायदाच जनतेला होत नसल्याचा आरोपही केला. ही योजना लोकांना परवडत नसल्याने पुन्हा त्यांना चुलीवर यावे लागले आहे. या चुली म्हणजे रोगांना निमंत्रण असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या. जनतेने गॅस सिलेंडर कनेक्शन घेतल्यामुळे रेशनवर मिळणारे रॉकेलही सरकारने बंद केले त्यामुळे सर्रास प्लास्टीक वापरलं जात आहे. जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कनेक्शन घेण्यासाठी २०० रुपयांपासून कुठे २२०० तर कुठे ८२०० पर्यंत पैसे घेतले गेले आहेत आणि लोकांच्या माथी ही उज्वला योजना मारण्यात आल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी यावेळी केला. रिकामे सिलेंडर नेण्यासाठी आणि भरलेला सिलेंडर आणण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना १५० रुपये तर प्रवासखर्चाचे १०० रुपये मिळून १ सिलेंडरला १००० रुपये मोजावे लागतात हे वास्तव चित्रफितीमध्ये महिलांनी उघड केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात या फसव्या योजनेविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.