कोल्हापूर : उध्दव ठाकरे यांना राजकारण कळतं का, कोणत्याही खात्याची त्यांना माहिती नाही. सरकारसोबत पटत नसेल तर घटस्फोट घ्या, सत्तेत तीन वर्षे नाक घासत घासत काढल्यामुळे उध्दव यांना नाक कुठे राहिले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापुरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे हे पक्ष स्थापनेनंतर प्रथमच राज्याच्या दौर्यावर आहेत. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा कोल्हापुरातून सुरु झाला. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. या परिषदेत राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, त्यापासून शिवसेना काही बोध घेणार का, अशी थेट टीका राणे यांनी उध्दव यांच्यावर केली. सत्तेत रहायचे आणि पंतप्रधानापासून मु्ख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीका करायची. आता केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरच टीका करायची बाकी आहे. इतकेच नाराज आहात तर बाहेर का पडत नाही? असा सवाल करत राणे म्हणाले, उद्धव सत्तेतून बाहेर पडले, तर त्यांचे दुकान बंद पडेल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेकजण संपर्कात
राज्यात नवीन पक्षाची आवश्यकता होती. ती उणीव भरुन काढण्यासाठी मी नवीन पक्ष काढला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा आहे; त्यामुळे राज्यातून अनेकजण माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्यास इच्छुक आहेत, असे नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. कोल्हापुरात आपल्याला शिवसेनेच्या आमदारांची संख्या शून्य करायची आहे असेही राणेंनी ठणकावले. विधानपरिषद पोटनिवडणुकीत मते फुटणारच होती असे सांगून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेकजण आपल्या संपर्कात आहेत, असेही त्यांनी सांगितले. नाना पटोलेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की पटोलेंनी कुठे जावे, काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही. ते आधीपासूनच भाजपवर नाराज होते असे राणे म्हणाले. सरकारवर जनता नाराज असेल तर आम्ही जनतेबरोबर राहू असे त्यांनी सांगितले. माझा पक्ष लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकील्ला आहे. मुलाचा राजीनामा हा त्याचे नुकसान ठरेल, असेही राणे म्हणाले.
कोल्हापुरात शिवसेनेचे नामोनिशाण राहणार नाही!
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहाही जागा शून्यावर आणीन, असे सांगतानाच राणे यांनी शिवसेनेचे नामोनिशाण राहणार नाही, पण शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचे नुकसान करणार नाही. त्यांची आमदारकी त्यांना मिळेल, फक्त ती कोणत्या पक्षाची असेल, हे तुमचे तुम्हीच ओळखा, असेही राणे म्हणाले. कोल्हापूरच नव्हे तर गडचिरोलीतही माझी जादू चालते, अशा शब्दात राणे यांनी विरोधकांना टोला लगावला. सध्या माझ्या पक्षात जो येईल, त्याला घेण्याचे धोरण नाही. मग माझ्या आणि इतर पक्षात काय फरक राहिला असा सवालही त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करणार नाही, असे सांगून राणे म्हणाले, मी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हाही बाळासाहेबांवर टीका केली नव्हती. गुजरातमध्ये भाजप सरकारला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगत असतानाच सध्या भाजपविरोधात नाराजी आहे, मग तुमचे धोरण काय असणार, असे पत्रकारांनी विचारताच जर जनता भाजपच्या विरोधात असेल तर आम्ही जनतेसोबत असू, असे राणे म्हणाले.