पुणे: ‘कोरोना’ फैलाव वेगानं होत असतानाही लोक सरकारच्या सूचनांचे पालन करत नसल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ‘सुशिक्षित लोकच बेजबाबदारपणे वागत असल्याचे हे दुर्देव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यसरकारला टोकाचं पाऊल उचलायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात साथीचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी लोक गर्दी करताना दिसत आहेत. आजार टाळण्यासाठी पाळाव्या लागणाऱ्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा जनतेला सरकारच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोनाच्या साथीचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भीतीचा फायदा घेऊन काही गोष्टींची साठेबाजी केल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. ‘मास्कची साठेबाजी करणाऱ्यांच्या विरोधात अशी कायदेशीर कारवाई केली जाईल की त्यांना त्यांच्या दोन पिढ्या आठवतील. यांना मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारेच म्हणायला हवं, असं ते म्हणाले. सरकारच्या सूचना लोकांनी गांभीर्यानं घेतल्या नाहीत तर अधिक कठोर पाऊल उचलावं लागेल, असंही ते म्हणाले.