पिंपरी-चिंचवड : ‘केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून महागाई गगनाला भिडली आहे. सरकारविरोधात रान पेटविण्याची हीच योग्य वेळ आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे जनतेमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर उतरावे. रस्त्यावर उतरल्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याचे स्वप्न पुर्ण होईल’’, असे सांगत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिलांना रस्त्यावर उतरण्याच्या सूचना केल्या.
निगडीत आढावा बैठक
निगडी येथील पिंपरी-चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत बोलताना चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ’सामाजिक, जनहिताचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरा, आंदोलने करा. भाजप सरकारला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे जनतेत मिसळण्याची हीच योग्य वेळ आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष संघटना बळकट करा. जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शांत बसायचे नाही. लोकसभा निवडणुकीला 16 महिने बाकी आहेत. या कालावधीमध्ये राष्ट्रवादीच्या महिलेने घरा-घरात पोहचले पाहिजे’’.
मनभेद होवू देवू नका
‘पक्ष संघटनेत काम करताना मतधेद होऊ देऊ नका, एक दिलाने काम करा. एकवेळ मतभेद चालतील परंतु, मनभेद होऊ देऊ नका. पदे शोभेसाठी घेतली नाही पाहिजेत. पद घेतल्यावर पदाला साजेशे काम करा. सगळ्या महिला काम करणार्या आहेत. परंतु, ’लीडर’ म्हणून वैशाली काळभोर यांची शहराध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करा. जानेवारी महिन्यात नवीन पदांची निमिर्ती केली जाणार आहे’’, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
सोशल मिडियाचा वापर करा
’’महिलांनी सोशल मिडियावर सक्रिय व्हावे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिव्टरचा वापर करावा. सोशलमिडियावरील संदेश फॉरवर्ड करताना काळजीपुर्वक करा. सोशल मिडियावर आपल्या नेत्यांच्या बाबत कोण वाईट बोलत असेल तर त्यांना जशाच तसे उत्तरे दिली पाहिजेत’’, असेही त्यांनी महिला कार्यकर्त्यांना सांगितले.