वाडा । देशातील तरुण रोजगार मागणार्या ऐवजी रोजगार देणारा व्हायला हवा. ग्रामीण भागातील तरुणदेखील उद्योजक व्हावेत यासाठी सरकार नवउद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी वाड्यात पत्रकारांशी बोलताना केले. तालुक्यातील हमरापूर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या क्रिष्णा कोरोगेटर्स प्रा. लि. ह्या पुठ्ठा व त्यापासून विविध उत्पादने तयार कराणार्या खासगी कारखान्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गिते यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी आमदार भरत गोगावाले, सद्गुरू दादासाहेब मोरे महाराज, शिवसेनेचे महाड विधानसभा संपर्क संघटक सुभाष पवार, जिल्हा परिषद सदस्य भारती कामडी, हमरापूर ग्रामपंचायतचे सरपंच संदीप गोवारी, उपसरपंच गजानन पाटील हे उपस्थित होते. उद्घाटनानंतर मंत्री गिते यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकार स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन देत आहे. मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य दिले जात आहे. पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासी जिल्ह्याचा औद्योगिकीकरणाद्वारे विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत. याभागात उद्योग उभारू पाहणार्या उद्योजकांच्या पाठीशी सरकार उभे आहे. स्टार्टअप इंडिया आणि स्मॉल स्किल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून नवउद्योजकांना औद्योगिक कारखाने उभारण्यासाठी दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम सरकार करत असल्याचे गिते म्हणाले. औद्योगिक कारखान्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊन पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रश्नावर निश्चितपणे मात करून दारिद्र्य दूर करण्यास मदत होईल, असेही गीते यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नवउद्योजकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.