सरत्या रोहिण्यासोबत आता मृग नक्षत्रही संपूर्ण कोरडे जाण्याची भीती

0

तर्‍हाडी । तर्‍हाडीसह परीसरातील काही तुरळक गावे सोडली तर मान्सून पुर्व व रोहिण्याच्या सरिव्यतिरिक्त अद्यापपर्यत मान्सूनने जोरदार हजेरी लावलेली नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अर्धा जुन महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने तर्‍हाडी, वरुळ भटाणे, भामपुर, विखरण परीसरातील बहुतेक सर्वच हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. ‘ये रे घना, ये रे घना’ अशी आर्त सार शेतकरी घालताना दिसत आहे. तर्‍हाडी परीसरात कापूस, मका, उडीद, मुग, बाजरी, ज्वारी, दादर आदी पीकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली गवार पीके धोक्यात आली आहे. पावसाअभावी पुढील महिन्यात भाजीपाल्याचे दर कडाडण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

संकटाची भीती
दरवर्षी अस्मानी संकटाशी सामना करणार्‍या बळीराजाची कथा आणि व्यथा समजायला आणि ऐकायला कोणी तयार नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी अनेकदा अनेक वर्षे खरीप हंगामात सापडलेल्या या परीसरातील शेतकर्‍यांना यदाही पावसाने पाठ फिरवुन संकटात टाकले आहे.

पेरण्या खोंळबल्या; शेतकरी चिंतेत
रोहीणी नक्षत्र लागले की सर्वाना पावसाचे वेध लागतात, परंतु तर्‍हाडी परीसरात रोहीणी या नक्षत्रात तुरळक पाऊस पडला व मृग नक्षत्रात अजूनही पाऊस पडला नाही. गेल्या काही दिवसापासून वारा सुटला असुन पाऊस पडणार की नाही, अशी चिंता शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे. रोहीण्याबरोबर मृग नक्षत्राचा पाऊसही नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोंळबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यदा कडक उन्हामुळे पावसाची सगळेच प्रतीक्षा करत आहेत, मात्र अजून पावसाने दमदार हजेरी लावलेली नसल्यामुळे परीसरातील नागरिक उकड्याणे त्रस्त झाले आहेत. ढगाळ वातावरणामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले असून प्रंचड उकडा जाणवत आहे. त्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध नागरीकाचे हाल होत आहेत. मानवासह पक्षु पक्षीही पावसाकरीता व्यकुळ झाले आहेत. भुगर्भातील पाण्याची पातळी खालवल्यामुळे बहुतांश टुवेल (बोरीग) जानेवारी महिन्यापासून कोरड्या पडल्या आहेत. सध्या ढगाळ वातावरणाचे सावट असल्याने उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

उधार उसनवारी करुन खताची तजवीज
रोहिण्यापाठोपाठ महत्वपुर्ण मृगही अगदी कोरडा जात असल्याने खरीप हंगामासाठी तयार असलेला परीसरातील शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. कोणी हातातील दाम खर्च करत तर कुणी घरातील सोन नाणं मोडुन, कुठे गहाण ठेवून, कुठे उधार उसनवार करून मोठ्या आशेने बियाणे व खताची तजवीज करून ठेवली आहे. कुणी बियाणे बुकिंग केले खर मात्र यंदा मेढ्यावर स्वार होऊन प्रवेशकर्ता झालेल्या मृगाचे स्थान आभाळातून पाऊसाचा एक थेंबही न पडल्याने सार्‍या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. आज पडेल, उद्या पडेल या आशेवर आकाशाकडे आशाळभूतपणे नजर लावणार्‍या शेतकर्‍यांच्या पदरी मृगाचे आठ दिवस तरी निराशाच टाकली आहे.