सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला

0
नवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी फेटाळला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर गैरवर्तणूक व अधिकारांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप ठेवून महाभियोग प्रस्ताव काँग्रेससह इतर सहा विरोधी पक्षांनी शुक्रवारी उपराष्ट्रपतींकडे मांडला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दाखल झालेला हा सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग होता.
या नोटिशीवर ७१ खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग या पक्षांचा प्रस्तावाला पाठिंबा होता. या महाभियोग प्रस्तावला फेटाळून लावत आज (सोमवार) व्यंकय्या नायडू यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी समजते. या महाभियोग प्रस्तावाला जर उपराष्ट्रपतींनी फेटाळला तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, असा इशारा कॉंग्रेसने यापूर्वीच दिला होता. यामुळे आता कॉंग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला असून महाभियोग हा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे या प्रस्तावाच्या चर्चेला मी सहभागी होणार नाही, असे ते म्हणाले. भाजपाने काँग्रेसचा महाभियोग प्रस्ताव हे राजकीय हत्यार असून सुडबुद्धीने रचलेले कारस्थान असल्याचा आरोप केला होता.