सशस्त्र सुरक्षा दलाला ध्वज व समूहगानातून अनोखी मानवंदना

0

पुणे । ध्वजाची आकर्षक रंगावली… भारत माता की जय… जय जवान जय किसान… या घोषणांनी दुमदुमलेला परिसर….आणि विजयी विश्‍व तिरंगा प्यारा, झंडा ऊचा रहे हमारा…’ या समूहगीतांतून चिमुकल्यांनी ध्वजाला वंदन केले. देशभक्तीने भारलेल्या वातावरणात तब्बल 500हून अधिक विद्यार्थ्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजासह सशस्त्र सुरक्षा दलाच्या ध्वजाप्रती असलेला आदर अनोख्या पद्धतीने व्यक्त केला.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन कार्यक्रम अप्पा बळवंत चौकातील नूतन मराठी शाळेमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी कर्नल सदानंद साळुंखे, संयोजक मोहन जोशी, रवींद्र गायकवाड, राजा महाजन, पराग गोडबोले, चित्रा माळवे, स्वाती मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नागमोडे आदी उपस्थित होते. यावेळी 20 बाय 30 आकारातील भव्य रंगावली काढण्यात आली. शाळेतील 500हून अधिक विद्यार्थ्यांनी समूहगानातून मानवंदना दिली. अमर लांडे आणि सहकार्‍यांनी रंगावली काढली.

आदर व्यक्त करण्यासाठी…
जोशी म्हणाले, आपल्या राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी त्याचे पूजन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. देशाचे रक्षण करण्याचे काम सैनिक करीत असतात. अशा शूरसैनिकांना वंदन करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी तसेच त्यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यशराज पारखी यांनी सूत्रसंचालन केले. चेतन आगरवाल यांनी आभार मानले.

जवानांची आठवण सदैव ठेवा
कर्नल साळुंखे म्हणाले, आपल्या मनात कायम देशाविषयी प्रेम असले पाहिजे. आई-वडिलांना अभिमान वाटावा असे काम केले पाहिजे. आपल्या चांगल्या वर्तणुकीतून आपल्या शाळेचे नाव देखील मोठे केले पाहिजे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्या, जवानांची आठवण आजच्या दिवासापुरती मर्यादित न ठेवता ते सदैव तुमच्या मनामध्ये असू द्या, असेही ते म्हणाले.