सोलापूर : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल समुहा’वर सेबीने टाच आणली आहे. मात्र सेबीच्या कारवाईनंतर देशमुखांनीच सेबीवर पलटवार केला. ज्यांना आपले शेअर्स पाहिजेत, त्यांना आम्ही ते परत करु, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले.
सेबीचे नियम माहित नव्हते
भागधारांची फसवणूक केल्याप्रकरणी सेबीने सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल समुहा’वर जप्तीची कारवाई केली. देशमुखांसह त्यांच्या नातलगांनी केलेले व्यवहार ही भागधारकांची फसवणूक असल्याचा आरोप आहे. देशमुखांनी मात्र सेबीचे नियम माहित नसल्याचा दावा केला आहे. कारखाना काढताना आम्ही सेबीचे नियम माहित नव्हते. त्यामुळे ज्या भागधारकांना आपले शेअर्स पाहिजे आहेत, त्यांना आम्ही ते परत करु, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिले.
लोकमंगलने शेतकऱ्यांच्या जमिनी कमी पैशात खरेदी केल्या. या जमिनींची आजची किंमत 108 कोटी रुपयांच्या घरात आहे. ही रक्कम दहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना परत करण्याचा सूचना सेबीनं दिल्या आहेत. म्हणजेच लोकमंगलला आता शेतकऱ्यांना १२० कोटी रुपये परत करावे लागणार आहेत.