चाळीसगाव : सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या सह्याद्री महिला उत्तर महाराष्ट्र विभागीय संपर्कप्रमुखपदी अमळनेर येथील अॅड.तिलोत्तमा चुडामण पाटील यांची निवड करण्यात आली. ही निवड संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष निलेश जेजुरकर व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे यांनी केली आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या सुवर्णशिल्पांच्या म्हणजेच गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी उभी केलेली दुर्गसंवर्धन चळवळ ही राज्यातील प्रत्येक गावापर्यंत आणि त्या गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी. जेणे करून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे प्रमुख साक्षीदार, सुवर्ण शिल्पे असलेले हे गड-किल्ले जतन करण्याच्या कामासाठी अजून बळकटी मिळेल आणि दुर्गसंवर्धन चळवळीचा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा म्हणजेच शिवरथ यात्रेचा प्रसार त्या विभागातील जनमाणसापर्यंत पोहोचवता येईल, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे यांनी दिली. निवडीबद्दल अॅड.तिलोत्तमा पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.