सांगलीत उभा राहणार जागतिक स्तरावरचे ‘बुद्धिबळ भवन’ !

0

सांगली : आता जागतिक पातळीवर सांगलीला एक नवी ओळख मिळणार आहे. राजकीय सारीपाटात महत्वाचे स्थान असलेल्या सांगलीत आता जगातील पहिले ‘बुद्धिबळ भवन’ उभारले जाणार आहे. लवकरच हे काम सुरु होणार असल्याची माहिती आहे. विश्वनाथन आनंदपासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकित बुद्धिबळपटूंना घडविणा-या सांगलीत साकारले जाणार आहे. २५ हजार चौरस फुटातील प्रस्तावित इमारतीस बुद्धिबळाच्या पटाचे स्वरूप देण्यात आले असून, एकाचवेळी पाचशे खेळाडूंच्या स्पर्धेची तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांची व्यवस्था येथे उपलब्ध होणार आहे.

पन्नास वर्षांची अखंड परंपरा
१९४१ मध्ये बुद्धिबळाचे भीष्माचार्य दिवंगत भाऊसाहेब पडसलगीकर यांनी स्थापन केलेल्या येथील नूतन बुद्धिबळ मंडळाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली असून या मंडळाने राज्य, राष्ट्रीय स्पर्धांची पन्नास वर्षांची अखंड परंपराही जपल्याने संपूर्ण बुद्धिबळ विश्वात सांगलीचे नाव कोरले गेले आहे. या स्पर्धांमध्ये पाचवेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद, ग्रॅण्डमास्टर के. शशिकिरण, पी. हरिकृष्णा, अभिजित कुंटे, बी. अधिबान, राहुल शेट्टी, आर. बंडोपाध्याय, जयंत गोखले, प्रवीण ठिपसे, एन. सुधाकरबाबू आदी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

भवनासाठीचा प्रस्ताव पाठविला
सांगली ब्रॅँडिंगसाठी पुढाकार घेतलेल्या सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी बुद्धिबळातील सांगलीची ओळख अधोरेखित करण्यासाठी जगातले एकमेव बुद्धिबळ भवन उभारण्याचा निर्णय घेतला. २८ डिसेंबर रोजी क्रीडा संचालकांकडे भवनासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मिरजेतील क्रीडा संकुलाच्या जागेत पाचमजली इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. सांगलीचे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी हा आराखडा केला आहे. सहा कोटी ५८ लाखांचा हा प्रस्ताव आहे. मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच सांगलीला हा नवा ठेवा उपलब्ध होणार आहे.

आकर्ष इमारत वेधणार लक्ष
ही वास्तू आकर्षक आणि बुद्धिबळाला समर्पित अशा स्वरुपाची असणार आहे. कोणत्याही दिशेने या इमारतीकडे पाहिल्यानंतर बुद्धिबळाचा पट दिसेल, अशी ही रचना आहे. हेलिकॉप्टरमधून खाली पाहिल्यानंतरही एक मोठा पट अंथरल्याचे चित्र दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आवश्यक असणारी काचेचे सभागृह, डिजिटल स्क्रीन, पे्रक्षक गॅलरी, प्रेस रुम, कॅन्टीन, निवास व्यवस्था येथे प्रस्तावित आहे. एकाचवेळी पाचशे खेळाडूंना खेळता येईल आणि राहता येईल, अशी रचना करण्यात आली आहे. शासनाच्या मंजुरीनंतर साडेतीन वर्षात ही इमारत उभी राहणार आहे.