साकेगाव । चैत्र शुध्द पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भवानी मातेच्या ध्वजाची रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत मिरवणूक काढून भवानी नगरातील भवानी मातेच्या मंदिरावर रात्री बरोबर 12 वा. ध्वज लावण्यात येतो. यासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात येते. गेल्या 35 वर्षापासून ही परंपरा कायम चालू असली तरी यावर्षी चैत्र शुध्द पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री ध्वजाची मिरवणूक न काढल्याने गावामधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वाजंत्री लावून ध्वज लावण्याची होती पद्धत
चैत्र शुध्द पौर्णिैमेच्या दिवशी भवानी मातेची मोठ्या उत्साहात यात्रा भरत असून या उत्सवानिमित्त गावातील बालगोपालासह मोठा जल्लोष साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी ध्वज न काढल्याने भाविकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. 1978 साली बालयोगी तुकाराम महाराज यांनी भवानी मातेची मुर्ती जयपुर येथून आणून गावातून वाजत गाजत वाघूर नदीच्या जवळच्या उंच अशा टेकडीवर मुर्ती बसवून 9 दिवस यज्ञ व अभिषेक करून मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करण्यात आली. तेव्हापासून न खंड पडता ध्वजाची मिरवणूक काढून गावातील मिरवणूकीच्या आधी पाण्याचा सडा व रांगोळ्या काढून ध्वजाची पुजाअर्चा करून गांधी चौकातील पिंपळाच्या झाडांंची पूजा करून ध्वजाच्या मिरवणूकील प्रारंभ करण्यात येतो व रात्री ध्वजाची मिरवणूक भवानी मातेच्या मंदिराजवळ पोहचून ध्वज मंदिरावर चढविण्यात येतो. मात्र काल मंदिरावरच तिथल्या तिथेच वाजंत्री लावून 12 वाजेच्या सुमारास ध्वज लावण्यात आला व त्याआधी गांधी चौकातील पिपंळाच्या झाडाची तिथेच पूजा केली जाते.