पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसतर्फे जनसंपर्क अभियान
स्वत:ला ‘विष्णू’चा अवतार म्हणवून घेणार्या प्रधानसेवकाचा प्रभाव संपला
पिंपरी चिंचवड : स्वत:ला ‘विष्णू’चा अवतार म्हणवून घेण्यात धन्यता मानणार्या प्रधानसेवकाचा प्रभाव आता संपला आहे. मागील साडेचार वर्षात देशातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. आपले अपयश झाकण्यासाठी विरोधकांवर पातळी सोडून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व व प्रधानसेवक करीत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी थेरगाव येथे केली. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने शनिवार (दि. 8 डिसेंबर) पासून जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत थेरगांव, ड्रायव्हर कॉलनी येथे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे, अनुसूचित जाती विभागाचे संघटक मनोज बागडी, गौतम आरकडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, प्रदेश युवक सरचिटणीस मयुर जयस्वाल, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालीया, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, सुंदर कांबळे, सज्जी वर्की आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
देशातील महिलांचा अपमान…
डॉ. महाजन म्हणाले की, ज्यांना मनमोहनसिंग सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणा रुचल्या नाहीत त्या भांडवलदारांनी सूड भावनेने काँग्रेस विरोधात काम केले. भाजपने काँग्रेसची खोटी बदनामी करून सत्ता मिळवली. भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे नसताना अनेक आरोप भाजपने केले. खोटी आश्वासने देऊन मिळविलेली सत्ता टिकवण्यासाठी भाजप वाटेल त्या स्थराला जात आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे इव्हीएम मशीनचे वृत्त सर्वांनी पाहिले आहे. ही मंडळी देश विकायला निघाली आहेत त्यांच्या तावडीतून देश मुक्त करावा असेही आवाहन डॉ. महाजन यांनी नागरिकांना केले. काँग्रेसच्या विधवेने विधवा महिलांचे अनुदान खाल्ले अशी देशातील महिला भगिनींचा अपमान करणारी भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान निवडणूकीत प्रचारात वापरली. अशी गावगुंडांची भाषा पंतप्रधानांनी वापरावी हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले.
अभियानातून जनजागृती…
शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी अभियानाबाबत माहिती दिली. शहरात प्रथम ब्लॉक पातळीवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागात जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. काँग्रेस सरकारने सत्तेवर असताना देशासाठी केलेले काम लोकांसमोर मांडले आहे. त्याबरोबरच भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून देशाची झालेली आर्थिक, सामाजिक पीछेहाट लोकांसमोर आकडेवारीसह ठेवण्यात येणार असल्याचेही साठे यांनी सांगितले. सुत्रसंचालन मयुर जयस्वाल आणि आभार नरेंद्र बनसोडे यांनी केले.