रावेर । वाढते तापमान लक्षात घेता वृक्ष संवार्धनाशिवाय महाराष्ट्रात मागील वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वनमहोत्सवास सुरवात करण्यात आली असून मागील वर्षात 1 जुलै 2016 या दिवशी वनविभागाने सातपुडा पर्वत रांगांमध्ये एकाच दिवशी 2 लक्ष 16 हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून इतर शासकीय कार्यालये, शाळा यांनी देखील 35 हजार झाडे लावली होती.
तयारी अंतिम टप्प्यात
यावर्षी शासनाने वनमहोत्सव सप्ताह राबविण्याचे ठरविले असून यात ‘एकाच लक्ष चार कोटी वृक्ष’ या मोहिमेत रावेर तालुक्यात वृक्ष लागवड पूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहचली असून वनविभागाकडे 6 गावातील नऊ ठिकाणी असलेल्या रोपवाटिकेत 3 लक्ष 55 हजार 800 रोपे लागवडी योग्य तयार करण्यात आले आहेत. 23 गावांमधून पेसा अंतर्गत 46 हजार 500 तर 95 ग्रामपंचायतीमधून 38 हजार रोपे विकसित करण्यात आली आहेत.
गावपातळीवर समितीचे केले गठण
मोहीम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष म्हणुन तर उपवनसंरक्षक संजय दहिवले हे समन्वयक म्हणुन काम बघत असुन रावेर तालुक्यात समिती अध्यक्ष म्हणुन प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील तर सदस्य सचिव म्हणुन वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे तर तालुक्यातील सर्व अधिकारी सदस्य म्हणुन मोहीम राबविण्यासाठी तत्पर आहे. गाव पातळीवर सरपंच अध्यक्ष असतील तर वनपाल सदस्य सचिव राहतील.
जनजागृती करणार
वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने तीन बैठका झाल्या असुन सोळा गावांमध्ये गांव पातळीवर देखील बैठका घेण्यात आलेल्या आहेत. पाल येथील वृक्षदिंडीद्वारा जनजागृती मोहीमेस सुरुवात करण्यात आली व शाळा महाविद्यालय, आठवडे बाजार, बसस्थानक याठिकाणी देखील वन कर्मचार्यांद्वारा समुपदेशन करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीसाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा, श्रीराम फाउंडेशन, माउली फाउंडेशन यांसह खाजगी शाळा, होमगार्ड पथक व इतर सेवाभावी संस्था सहभागी होणार असुन शासनाच्या ग्रीन आर्मी या ऑनलाईन नोंदणी करणार्या संस्था व व्यक्ती यांनाच रोपे उपलब्ध करुन देण्यात येतील. सावदा येथे रोपे आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत असुन त्या ठिकाणी अत्यल्प दर आकारुन रोपे घेता येतील असेही आवाहन वनक्षेत्रपाल राणे यांनी केले आहे.