सात संशयितांना अटक तर तीन अल्पवयीन ताब्यात

0

जळगाव : शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आवारात असलेल्या जनकल्याण समितीच्या भोजन वाटप कक्षाजवळील सुकलेल्या झाडाची फांदी मंगळवारी अचानक कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने तर संतप्त जमावाने जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या दालनाची तोडफोड केली होती. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात 25 ते 30 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलीसांनी सात संशयितांना अटक केली असून त्यांच्यासह तीन अल्पवयीन संशयितांना देखील ताब्यात घेतले आहे. यातील बुधवारी रात्री अटक केलेल्या दोघांना आज न्या. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना न्या. कुलकर्णी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांना यानंतर जामीनासाठी अर्ज दाखल केला असता तो न्या. कुलकर्णी यांनी फेटाळून लावला.

अशी घडली होती घटना
जनकल्याण समितीमध्ये कार्यरत असलेल्या संगिता प्रविण सोनवणे (वय 32) रा.तुकाराम वाडी यांची मुलगी चिन्मयी (वय 7) हिचा सोमवारी वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संगीता या मंगळवारी रूग्णांच्या नातेवाईकांना चिवडा वाटप करणार होता. सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे प्रार्थना केली आणि त्या कक्षाच्या बाहेर आल्या. 11 वाजेच्या सुमारास संगीता या कक्षाबाहेर येताच सुकलेल्या झाडाची फांदी त्यांच्या डोक्यात कोसळली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या जमावाने आराडाओरड करीत जिल्हा शल्यचिकीत्सक भामरे यांची कॅबीनची तोडफोड केली. खुर्च्या, टेलीफोन, टेबल इतर मशीनची नासधूस केली होती. या तोडफोडप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात 25 ते 30 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले होते.

अटक सत्र सुरू
जिल्हा पेठ पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर अटक सत्र सुरू केले. बुधवारी पोलीसांनी विक्की शंकर चौधरी व नितीन राजेंद्र चौधरी या संशयितांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर तोडफोडीत सहभागी साथीदारांचे नावे सांगितली. यानंतर पोलीसांनी गुरूवारी सायंकाळी पुन्हा अटक सत्र सुरू करून ईश्‍वर रामप्रसाद परदेशी, चंद्रकांत ज्ञानेश्‍वर पाटील, अजय अरूण मराठे, नितीन राजू माळी, गणेश जितेंद्र भावसार सर्व रा. तुकारामवाडी या पाच संशयितांना अटक केली. यातच यांच्यासह पोलीसांनी तीन अल्पवयीन युवकांना देखील ताब्यात घेतले आहे.

न्यायालयीन कोठडीत रवानगी
जिल्हा पेठ पोलीस यांनी बुधवारी रात्री अटक केलेले विक्की शंकर चौधरी व नितीन राजेंद्र चौधरी या दोन्ही संशयितांना गुरूवारी दुपारी न्या. के.एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायाधीश कुलकर्णी यांनी दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयितांच्या वकीलांनी न्या. कुलकर्णी यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, त्यावर कामकाज हावून न्या. कुलकर्णी यांनी संशयितांचा जामीन अर्ज देखील फेटाळून लावला. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा पेठ पोलीस इतर संशयितांचा शोध घेत आहे.