साध्वी प्रज्ञांचे वक्तव्य निषेधार्ह: विजया रहाटकर

0

मुंबई: साध्वी प्रज्ञा सिंह यांनी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते, हे वक्तव्य चुकीचे आणि अयोग्य आहे. करकरे देशासाठी शहीद झाले आणि त्यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञा जे बोलल्या ते निश्चितच निषेधार्ह आहे, असे मत भाजपाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे. साध्वी प्रज्ञा जे बोलल्या ते चुकीचे आहे, त्यावर त्यांनी माफीही मागितली आहे. मात्र, मुळात त्यांनी असे बोलणेच चुकीचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

अंमळनेर येथे माजी आमदाराला जिल्हाध्यक्षाकडून झालेल्या मारहाणीबाबत त्यांना विचारण्यात आले असता अमळनेरमध्ये जे काही झाले तो आमच्यासाठी इतिहास आहे. आम्ही आता ते सारं विसरून कामाला लागलो आहोत. स्थानिक पातळीवर वाद झाले हे मान्य आहे. मात्र, आम्ही सगळेजण कामाला लागलो आहोत, आम्हाला स्मिता वाघ यांचीही साथ मिळाली आहे. उन्मेष पाटील हे जळगावातले आमचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणणं हे आमचं लक्ष्य आहे. त्यामुळे वादाचा मुद्दा संपला आहे. जळगावात स्थानिक पातळीवर काहीही वाद नाहीत असंही विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे.