सिडनी:आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप सध्या सुरु आहे. यात भारतीय महिला संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. आज भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ‘अ’ गटातील अव्वल संघ म्हणून टीम इंडियाचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात न आल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे. भारताने अ गटात 8 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते आणि त्याच जोरावर त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का झाला. इंग्लंडच्या खात्यात 6 गुण होते. यापूर्वी टीम इंडियाला २००९, २०१० आणि २०१८ मध्ये उपांत्य फेरीतून माघारी परतावे लागले होते.