सासरच्या जाचाने विवाहितेचा मृत्यू : चिंचखेड्याच्या माय-लेकाला सात वर्ष शिक्षा

0

भुसावळ : घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बु.॥ येथील सासर व बुलढाणा जिल्ह्यातील आलमपूरच्या 25 वर्षीय विवाहितेचा पतीसह सासूकडून सातत्याने छळ सुरू होता व या छळाला कंटाळून विवाहितेने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुरूवातीला मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल होती तर नंतर विवाहितेच्या कुटुंबियांनी पतीसह सासु-विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालल्यानंतर आरोपींना सात वर्ष शिक्षा व दंड सुनावण्यात आला.

छळ असह्य आल्याने विवाहितेची आत्महत्या
या खटल्याची पार्श्‍वभूमी अशी की, तक्रारदार पार्वताबाई वसंता खराटे (रा.आलमपूर, ता.नांदुरा, जि.बुलढाणा) यांची कन्या यशोदा उर्फ योगीता अनिल खोंदले (25) हिचा 2011 मध्ये चिंचखेडा येथील अनिल तुकाराम खोंदले यांच्याशी विवाह झाला होता. पार्वताबाई यांच्या पतीचे 25 वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांची शेती बुडीत क्षेत्रात गेल्याने शासनाकडून त्यांना सात लाखांची भरपाई मिळाली होती ही बाब खोंदले कुटुंबियांना कळाल्याने त्यांनी यशोदाचा लग्नानंतर घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत म्हणून सातत्याने शिवीगाळ व मारहाण करून छळ सुरू केला होता. मुलीचा होणारा छळ पाहता पार्वताबाई यांनी खोंदले कुटुंबियांना 50 हजार रुपये दिल्यानंतर जानेवारी 2017 मध्ये मुलीला नांदवण्यासाठी नेण्यात आले मात्र छळ कायम सुरू राहिला. छळ असह्य झाल्याने 16 मार्च 2017 रोजी सकाळी यशोदाने आपल्या आईला फोन करून त्रासाची माहिती देत माहेरी नेण्याची विनंती केली होती तर दुपारी चुलत दीर विकास खोंदले यांनी यशोदाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. सुरुवातीला मयत विवाहितेच्या पतीने मुक्ताईनगर पोलिसात पत्नी संतापी असल्याचे सांगत ती नेहमीच भांडण करीत असल्याने तिने संतापात कापसावर फवारणीचे कीटकनाशक प्राशन केल्याचे भासवत मुक्ताईनगर पोलिसात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

पती-सह सासुविरुद्ध दाखल झाला गुन्हा
मयत यशोदा हिचा पती अनिल तुकाराम खोंदले व सासु यशोदाबाई तुकाराम खोंदले (चिंचखेडा बु.॥, ता.मुक्ताईनगर) यांनी घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये न आणल्याने छळ चालवला होता व छळ असह्य झाल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची तक्रार पार्वताबाई खराटे यांनी दिल्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात सरकारी वकीलांनी सहा साक्षीदार तपासले व त्यात आईसह भाऊ व मेहुण्याची साक्ष महत्वाची ठरली. न्या.आर.आर.भागवत यांनी आरोपी पती अनिल खोंदले यास भादंवि 304 ब अन्वये सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा 10 हजार रुपये दंड तसेच सासु यशोदाबाई खोंदले यांना 498 अ मध्ये तीन वर्ष साधी शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.विजय खडसे यांनी प्रभावी बाजू मांडली तर आरोपींतर्फे अ‍ॅड.मोरे (मलकापूर) यांनी युक्तीवाद केला. तत्कालीन तपासाधिकारी हेमंत कडूकार यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला.