साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकावा- डॉ.मुणगेकर

0

पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी श्रीमती नयनतारा सेहगल यांची माफी मागून त्यांना परत न बोलावल्यास समस्त मराठी जनतेने यवतमाळ येथील साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकावा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी केले आहे.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ख्यातनाम साहित्यिका नयनतारा सेहगल यांना यवतमाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक म्हणून निमंत्रित केल्यानंतर केवळ त्या इंग्रजी भाषिक साहित्यिका असल्याचे भंपक कारण देऊन त्यांना उदघाटनपद नाकारणे ही बाब निषेधार्ह आहे. त्यामागचे खरे कारण अर्थातच एक संवेदनशील साहित्यिका म्हणून त्यांनी लिखित उदघाटनपर भाषणात नमूद केल्याप्रमाणे देशातील वाढत्या असहिष्णूतेवरचे भाष्य हे कारण आहे. ही वैचारिक स्वातंत्र्याची गळचेपी आहेच. परंतु तमाम साहित्य वर्गाचा उपमर्द आहे. अर्थात, हा निर्णय संमेलनाच्या कणाहीन संयोजकांचा नसून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या दबावाचा तो परिणाम आहे असे मुणगेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अशाच दबावामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने, दहा दिवसांवर येऊन ठेपलेले असताना, सुमारे वर्षभर तयारी केलेले व एक हजार प्रतिनिधींनी नोंदणी केलेली अखिल भारतीय ऐतिहासिक परिषद कोणतेही कारण न देता रद्द केली. राज्य घटनादत्त व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी विद्यमान सत्ताधाऱ्यांची मग्रुरी ठेचून काढण्याची हीच वेळ आहे त्यामुळे श्रीमती सेहगल यांची माफी मागून संयोजकांनी त्यांना उदघाटक म्हणून पुन्हा न बोलविल्यास समस्त मराठी साहित्यिक व जनतेने यवतमाळ साहित्य संमेलनावर बहिष्कार घालावा. तसे न झाल्यास भारतातील उदारमतवादाचे जनक आणि मराठी साहित्य संमेलनाचे शिल्पकार न्या.महादेव गोविंद रानडे यांच्याशी प्रतारणा केल्यासारखे होईल आणि साहित्य प्रतिभाही अर्थशून्य होईल असेही मुणगेकर यांनी म्हटले आहे.