नाशिक । आमची पिढी गोंधळलेली आहे. डिजिटल क्रांतीने आम्ही गोंधळून गेलो आहोत. भारत व इंडियाचा संबंध कसा लावावा हे आम्हाला कळत नाही. हे सांगण्याचे काम साहित्यिकच चांगले करू शकतो. मात्र, त्याने निर्भिडपणे लिहिले पाहिजे. त्यासाठी आधी साहित्यात गट-तट नसावेत, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अनासपुरे पुढे म्हणाले, की साहित्यात जसे गट-तट होऊ नये तसेच शेतकर्यांमध्येही प्रादेशिक फुटीची चिन्हे दिसू लागली आहेत. विदर्भातील शेतकर्याला वाटते की कोकणातला शेतकरी फार आरामात आहे. कुणाला वाटते उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांना पॅकजेस घेण्याची सवयच लागली आहे. असे वाद होणे हे भीतीदायक आहे. अखंड शेतकरी एकच आहे. एकच संस्कृती आहे.
एकांगी वाचनाने चुकीचा अभिनिवेश येतो
वाचनाविषयी बोलताना अनासपुरे म्हणाले, की वाचन एकांगी असल्यावर चुकीचा अभिनिवेश येतो. त्यामुळे सर्व बाजूंनी वाचावे. चांगले पुस्तक कोणते, त्याची यादी द्या असे सरांना सांगितल्यावर दहा पाने वाचल्यावर पुढे वाचावेसे वाटेल ते पुस्तक चांगले, दहा पानांच्या आत कंटाळा आला की ते पुस्तक खाली ठेवून द्यावे असे साधे सोपे गणित सरांनी शिकवल्याचे अनासपुरे म्हणाले. साहित्य खूप काही बोलते, वाचन माणसाला गुंतवून ठेवते. हे वाचनपर्व निष्ठेने जोपासले असते तर पुतळ्यांवर झाला एवढा खर्च करावा लागला नसता.
माध्यमे तेज आहेत
जातीअंत करू या असे पहिलीच्या पुस्तकात म्हणायचे आणि दाखल्यावर मात्र पहिल्यांदा जात विचारून घ्यायची अशी पध्दत आपल्याकडे आहे. आजची माध्यमे तेज होत चालली आहेत. इतकी की आता बोलत असलेले लगेचच कुठेतरी येईल अशीही व्यवस्था आज आहे. दररोज नित्यनूतन साहित्यिक जन्माला येत आहेत. हे देखील धोक्याचे आहे. ही संस्कृती व ही परंपरा टिकवणारी माणसे एकमेकांना जोडली जाणे जास्त महत्त्वाचे आहे आणि ते काम साहित्यिकच करू शकतो.
साहित्यात कडवटपणा येत आहे
आताच्या साहित्यात कडवटपणा येत चाललेला आहे. लेखकाने यातना सहन केलेल्या असतात वेदनेशिवाय व यातनेशिवाय लिखाण होत नाही. मात्र हा संक्रमणाचा काळ आहे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. आम्ही एक होता कार्व्हरसारखे पुस्तक वाचून घडलो. मात्र त्याकाळी दुखण्याचे भांडवल करण्याची पध्दत नव्हती. आता मात्र ते वाढले आहे. नेमाडेंचा देशीवाद मला भावला तसेच गंगाधर गाडगीळांचे साहित्यही मला आपले वाटत गेले. वाचनात वर्ज्य काही नसावे या मताचा आहे, असे अनासपुरे यांनी नमूद केले.
तरुण पिढी संदिग्ध
ज्यांनी मनातील सांगितले, ज्यांचे अंतरंगात थिजवून घ्यावेसे वाटले. त्यांचे कौतुक झाल्याचे ऐकिवात नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचे कोणी कौतुक केले. आता मात्र असे होता कामा नये. दत्ता पाटील अध्यक्ष झाले तर त्यांचे भाषण छापील प्रती करून वाटावे कारण तरुण पिढीला काय हवेय ते त्यातून कळेल. आजची तरुण पिढी संदिग्ध वातावरणात आहे. रिअल हिरो शोधण्यात त्यांचा वेळ वाया जातोय त्यापेक्षा रिअल हिरो शोधण्याचे तंत्र आपण प्रत्येक पिढीला दिले पाहिजे. जिल्हास्तरीय मेळावे झाले पाहिजे त्यातूनच दडलेले परिस शोधता येतील असेही अनासपुरे म्हणाले.