साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

0

मुंबई-प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे यवतमाळ येथे होत असलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदाचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याने मराठी साहित्य संमेलनात वाद निर्माण झाला असतानाच आता साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर राजीनामा पाठवून त्यांनी राजीनामा दिला. तसेच सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभार मानले. आता महामंडळाच्या उपाध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिल्याने हे निमंत्रण रद्द करीत असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी सांगितले होते. डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यजमानपद आहे. सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर महामंडळ आणि आयोजक संस्था या नामुष्कीचे खापर परस्परांच्या डोक्यावर फोडत आहेत.