हिवरा आश्रम : निष्काम कर्मयोगी संत पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या कार्याने जगाच्या पाठीवर ख्यातकीर्त झालेल्या विवेकानंद आश्रमात 91 वे साहित्य संमेलन घेण्यात यावे. या साहित्य संमेलनाचे आयोजकत्व विवेकानंद आश्रमास मिळावे, यासाठी विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळाने अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्यानुसार महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी नुकतीच आश्रमास भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. हे साहित्य संमेलन देशाची राजधानी नवी दिल्ली येथे घेण्याबाबत काही सामाजिक संस्था सक्रीय झाल्या असून, तसे प्रस्तावही आले आहेत. तसेच, दिल्लीतील मराठी राजकारणीदेखील महाराष्ट्राच्या शक्तिप्रदर्शनाच्या अनुषंगाने दिल्लीलाच संमेलन घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे यंदाचे साहित्य संमेलन हिवरा आश्रम की नवी दिल्ली येथे घ्यावे, असा प्रश्न साहित्य महामंडळाला पडला आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजकत्वासाठी प्रस्ताव दाखल करणारी संपूर्ण विदर्भातून विवेकानंद आश्रम ही एकमेव संस्था ठरलेली आहे.
महामंडळ अध्यक्षांकडून पाहणी व आश्रमास भेट
बुलडाणा जिल्हा हा मराठवाडा, खान्देश व विदर्भाला जोडणारा सेतु असून, विदर्भाचे प्रवेशद्वार आहे. तसेच, कविवर्य ना. घ. देशपांडे, राजमाता जिजाऊ मॉसाहेब, संत चोखामेळा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वंदनीय संत गाडगेबाबा, निर्मोही संत गजानन महाराज, कर्मयोगी संत शुकदास महाराज यासारखे नररत्न या जिल्ह्याने दिलेले आहेत. यापूर्वी कधीही साहित्य संमेलन या जिल्ह्यात झालेले नाही. त्यामुळे साहित्यरसिक व सारस्वतांचे यजमानपद भूषविण्याची संधी कधीच या जिल्ह्याला लाभलेली नाही. ही संधी 91व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्याला लाभावी, यासाठी विवेकानंद आश्रमाच्यावतीने साहित्य महामंडळाकडे रितसर प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक व मानवहितकारी संत शुकदास महाराज हे स्वतः साहित्यरसिक, दार्शनिक व साहित्यिक होते. अनुभूति ही अभंगगाथा आणि मालकी नसलेली बोधवचने हा दार्शनिक ग्रंथ त्यांनी समाजाला दिलेला आहे. त्यामुळे साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यात व हिवरा आश्रम येथे घेण्यात यावे, यासाठी विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त मंडळ आग्रही असून, त्यासाठी प्रयत्नशील आहे. आश्रमाच्या प्रस्तावानुसार, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी नुकतीच विवेकानंद आश्रमास भेट देऊन पाहणी केली व नियोजनात्मक माहितीदेखील घेतली. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीसाठी राजधानीतील मराठी नेत्यांचा दबाव!
विवेकानंद आश्रमातर्फे दरवर्षी विवेकानंद जन्मोत्सव साजरा केला जात असतो. त्यानिमित्ताने तीन ते साडेतीन लाख भाविक हजेरी लावत असतात. तीन दिवस यानिमित्ताने मोठा ज्ञानयज्ञ येथे चालतो. त्यामुळे मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचा विवेकानंद आश्रमास दीर्घ अनुभव आहे. शिवाय, दोन हजार साहित्यिकांसह साहित्यरसिकांच्या निवास, भोजनाची व्यवस्थादेखील आश्रमाकडे असून, पाच हजार साहित्यरसिक बसतील असे भव्य विचारपीठ, सोयीसुविधा आणि दोन ते तीन हजार शिस्तबद्ध स्वयंसेवकांची फळीदेखील विवेकानंद आश्रमाकडे आहे. त्यामुळे साहित्यविश्व समृद्ध करणार्या बुलडाणा जिल्ह्याला यंदाचे यजमानपद द्यावे, असा आग्रह विवेकानंद आश्रम विश्वस्त मंडळांसह अनेक सारस्वतांनी साहित्य महामंडळाकडे धरलेला आहे. तथापि, दिल्ली येथेच साहित्य संमेलन घेण्यासाठी राजधानीतील मराठी नेत्यांचा असलेला राजकीय दबाव पाहाता, दिल्ली की हिवरा आश्रम? असा पेच साहित्य महामंडळाला पडलेला आहे. देशाची राजधानीविरुद्ध हिवरा आश्रमसारख्या ग्रामपंचायतीचे गाव, असा नवा संघर्ष यानिमित्ताने पहावयास मिळत आहे. महामंडळ काय निर्णय घेते याकडे साहित्यिकांसह साहित्यरसिकांच्या नजरा लागलेल्या आहेत.