सिंधुदुर्गचा दांडी पूल खचला

0

रत्नागिरी । रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या सागरी महामार्गावरील दांडी पूल खचला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक रत्नागिरीच्या बांधकाम विभागाने बंद केली आहे. गेल्या वर्षी सावित्री पुलाच्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सागरी महामार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रायगडपासून सिंधुदर्गापर्यंत समुद्राला समांतर जाणार्‍या सागरी महामार्गाची गेल्या काही वर्षांपासून उभारणी केली जाते आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अनेक पुलांची उभारणी यापूर्वीच झाली आहे. दांडी पुलाच्या या घटनेमुळे कोकणात होणार्‍या वाहतुकीवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. तसेच पावासाळयामुळे प्रवाशांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांची होतेय गैरसोय
अखेर या दांडी पुलाची वाहतूक अवजड आणि मोठ्या वाहनांकरता पूर्णतः बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक बंद झाल्याने या मार्गावरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ये-जा करणार्‍या हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून मालवण-वेंगुर्ला भागात पर्यटकांसाठी हा मार्ग होता

रत्नागिरी बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुलाचा खचणारा भाग सावरण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी बांधकाम विभागाकडून करण्यात आला. काही लाख रुपये यावर खर्च करण्यात आले. पण यात यश आले नाही. परिणामी दांडी पुलाचा बॉक्स रिटर्न खचल्याने बँक्स सेलवरील दबाव वाढला आणि यामुळेच राफ्ट, व्हर्टिकल वॉल आणि कट ऑफ वॉल यामध्ये भेगा पडू लागल्या आहेत. या भेगा गेल्या काही दिवसांत अधिकच रुंदावू लागल्याने अखेर मुख्य अभियंत्यांनी या पुलाची पाहणी करत या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबतचा पत्रव्यवहार रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी केला.

कोकणवासीयांसाठी पर्यायी मार्ग
सागरी महामार्गावरील हा पूल बंद झाला असला तरी रत्नागिरीतून राजापूरच्या डोंगर मार्गे या पुलाला पर्यायी मार्ग आहे. मात्र या मार्गावरून प्रवाशांना जवळजवळ 26 ते 28 किलोमीटरचा अधिकचा प्रवास करावा लागत आहे. संपूर्ण पावसाळ्याच्या काळात हा मार्ग पूर्णतः बंद राहील. पावसाळ्यानंतर या पुलाची डागडुजी करून हा मार्ग पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र तरीही प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे बांधकाम खात्याविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

बांधकाम विभाग अडचणीत
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या सागरी महामार्गावर अनेक मोठे पूल उभारले गेले आहेत. यातील अनेक पूल गेल्या काही वर्षांत विविध तांत्रिक कारणांनी चर्चेत असतानाच आता दांडी पुलाचा भाग खचूलागल्याने बांधकाम विभाग अडचणीत आले आहे. उद्घाटनाशिवाय सागरी महामार्गावरील अन्य पुलांप्रमाणेच हा पूलही रहदारीसाठी खुला केला गेला. पुलाच्या अणसुरे गावाकडील बाजू गेल्या काही वर्षांपासून खचू लागली होती.