सिंधुदुर्गातील समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू

0

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात वायरी समुद्र किनार्‍यावर बुडून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बेळगावातील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे 47 विद्यार्थी सहलीसाठी मालवणला आले होते. त्यातील काही जण आज सकाळी पोहण्यासाठी वायरी येथील समुद्रात उतरले. त्यामधील 11 जण समुद्रात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी किनार्‍यावरील लोकांनी आरडाओरडा केला. 11 पैकी तिघांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेच्या धक्क्यामुळे तेथे उपस्थित एक शिक्षिका बेशुद्ध पडली. तिच्यावरही उपचार सुरू आहेत. समुद्राच्या ज्या भागात हे विद्यार्थी गेले, तेथे तो समुद्र खोल व धोकादायक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सावधानतेचा इशारा देणारा फलकही लावण्यात आला आहे. मात्र उत्साहाच्या भरात विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाण्याचे धाडस केले आणि ते धाडस त्यांच्या जीवावर बेतले. बुडालेल्या तरुणांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील तिघांना वाचविण्यात त्यांना यश आले. या तिघांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्ग पोलीस वायरी समुद्र किनार्‍यावर पोहोचले. त्यानंतर पुढील तपास सुरु करण्यात आला.

संकेत गाडवी, अनिता हानली आणि आकांक्षा घाडगे अशी समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यात दोन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. मुजमीन अनिकेत, किरण खांडेकर, आरती चव्हाण, अवधूत, नितीन मुत्नाडकर, करुणा बेर्डे, माया कोले, प्रा. महेश अशी मृतांची नावे आहेत.