सुटीतही होणार तुरीची खरेदी

0

मुंबई : एका बाजुला नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे मागील आठवडाभर हवालदिल झालेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍या सरकारने काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पुढील तीन दिवस सुट्याचे आल्यामुळे तूर खरेदी होणार नाही, यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त बनला होता. मात्र पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सुट्यांच्या दिवशीही तूर खरेदी केली जाईल, अशी घोषणा केली.

पणनमंत्री देशमुख यांच्या घोषणेमुळे रात्रं-दिवस रांगेत उभ्या असलेल्या शेतकर्‍यांची होणारी वाताहात आता टळणार आहे. 22 एप्रिलपर्यंत ज्या तुरीची नोंद झाली आहे. त्याची तपासणी करून ती सर्व खरेदी केली जाणार आहे. असा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी तूर खरेदी केंद्रांसमोर रांगा लावल्या आहेत, मात्र सुटीच्या दिवशी ताटकळत बसायचे का, या विचाराने शेतकर्‍यांना भांडावून सोडले होते, मात्र आता पणनमंत्री देशमुख यांच्या घोषणेमुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सरकारचे विशेषतः मुख्यमंत्र्यांचे हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खरी तूर ही व्यापार्‍यांची आहे की शेतकर्‍यांची ही तपासण्यासाठी कमिटी नियुक्त केली आहे. शेतकर्‍यांचा सातबारा पेरा आणि सरासरी उत्पन्न तपासले जाणार आहे.

खर्‍या शेतकर्‍याला न्याय मिळाला पाहिजे. या सगळ्यात चतुर व्यापार्‍यांच भले होऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे. बारदाण्यामुळे कुठे तूर खरेदी राहू नये यासाठी जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले गेले आहेत. तूर खरेदीच्या जीआरमध्ये कुठल्याही जाचक अटी नाहीत. आता विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नाहीत म्हणून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.
पणनमंत्री सुभाष देशमुख