हैदराबाद । भारतीय क्रिकेट संघात गेल्या दीड सत्रात कामगिरीमध्ये सर्वाधिक सुधारणा करणारा गोलंदाज उमेश यादव आहे. यादव हा मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून देतो,असा तो गोलंदाज आहे. अशा शब्दांत भारताचे फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांनी यादवची प्रशंसा केली. बांगलादेशच्या पहिल्या डावात उमेशने दोन बळी घेतले आहेत. त्याने सकाळच्या सत्रात दोन स्पेलमध्ये गोलंदाजी केली.
त्याबाबत बोलताना शाकिब-अल-हसन म्हणाला की, मी माझ्या कारकिर्दीत सर्वोत्तम गोलंदाजीला सामोरे गेलो.बांगरने सांगितले, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दिल्ली कसोटी सामन्यानंतर आमच्या लक्षात आले, की उमेश संघाला महत्त्वाचे बळी मिळवून देत आहे. त्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये केवळ फिरकीपटूंच्या योगदानाच्या जोरावरच विजय मिळवलेले नसून वेगवान गोलंदाजांचीही थोडी मदत लाभली आहे. उमेशसारखा खेळाडू वेगळा आहे. गेल्या दीड सत्रामध्ये कामगिरीत सर्वाधिक सुधारणा करणारा तो गोलंदाज आहे. आज तिन्ही वेगवान गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळाला, पण वेग व टप्प्याच्या आधारावर उमेश सर्वांत महत्त्वाचा ठरला.