नंदुरबार ( प्रतिनिधी ) शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात राज्य परीक्षा मंडळाचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर कारवाई झाल्याने राज्यभरातील एजंट सावध झाले आहेत. आपल्यावर देखील छापा पडू शकतो, या भीतीने बहुचर्चित एजंटांनी पैशांची विल्हेवाट लावल्याची चर्चा रंगू लागली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेचा घोटाळा उघडकीस आल्याने पुणे पोलिसांनी आजी-माजी आयुक्तांसह काही हस्तकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत. आयुक्त तुकाराम सुपे यांनी कबुली दिल्यामुळे टीईटी परीक्षा घोटाळ्यातील एजंटांची पार दाणादाण उडाली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता एजंटांनी भावी गुरुजींकडून दोन ते तीन लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे. राज्यभरातून हीच रक्कम गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यातच आयुक्त सुपे यांना अटक झाल्याची बातमी पसरल्याने राज्यभरातील एजंट सावध झाले आहेत. परिणामी घरात ठेवलेल्या टीईटी नावाने लाखो रुपये देखील विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना संधी मिळाली असल्याचे बोलले जात आहे. जर का ही कारवाई गोपनीय राहिली असती किंवा एकाच वेळी नियोजनबद्ध करण्यात आली असती तर महाराष्ट्रातील सुपे यांच्या एजंटांकडे घरा-घरात लाखो रुपये सापडले असते, अशी चर्चा शिक्षणक्षेत्रात होऊ लागली आहे. नंदुरबार व शहादा येथील काही एजंटांची नावे समोर येत असल्याने ते समाजमाध्यमातून गायब झाले आहेत.