सैनिकांच्या शौर्यगाथेचा समावेश अभ्यासक्रमात

0

पुणे । देशातील शूर सैनिकांनी सीमेवर केलेल्या पराक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रमामध्ये समावेश केला जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांतही या सैनिकांसोबतच सीमेवर हौतात्म्य पत्कारलेल्या सैनिकांच्या प्रतिमांचे एक विशेष दालन उभारण्यात येणार आहे. याबाबत मानव संसाधन मंत्रालयाशी चर्चा सुरू असून, वर्षभरात सीबीएसईच्या विद्यालयाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश होईल, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. बी. एन. श्रीवास्तव फाउंडेशनला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सशस्त्रसेना वैद्यकीय महाविद्यालयातील धन्वंतरी सभागृहात लष्करातील जवानांसाठी भेटवस्तू तसेच कार्ड पाठवणार्‍या 14 शाळांचा व शिक्षकांचा सत्कार रावत यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे उपस्थित होते.

200 विद्यालयांतील अभ्यासक्रमात समावेश
रावत म्हणाले, देशाचे रक्षण करताना अनेक जवानांनी बलिदान दिले आहे. त्यांची माहिती विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात व्हावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 200 विद्यालयांतील अभ्यासक्रमात वीरांच्या माहितीचा समावेश केला आहे.

भेटवस्तूंमुळे देश आपल्या पाठीशी
भारतीय जवानांना भेटवस्तू तसेच राख्या पाठवण्याचे फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे, असे सांगून रावत म्हणाले, भारतीय लष्करातील जवान हा सीमेवर लढत असतो. एखादा सण साजरा करण्यासाठी कर्तव्यामुळे जवानाला घरी जाता येत नाही. अशा वेळी या विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या भेटवस्तूंमुळे देश आपल्या पाठीशी आहे, ही जाणीव या जवानांमध्ये वाढते. भारतीय सैन्यदल हे धर्मनिरपेक्ष सैन्यदल आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी भेटवस्तू पाठवताना विविध भाषांचा वापर करत त्यांच्या कल्पनेला वाव द्यावा, असे आवाहनही रावत यांनी विद्यार्थ्यांना केले. या वेळी भारतीय जवानांना जवळपास 7 हजार शुभेच्छापत्रे पाठवण्याचा विक्रम केलेल्या पुण्यातील डीएव्ही स्कूलला ‘फिल्ड मार्शल सॅम मानिकशॉ’ ही फिरती ट्रॉफी रावत यांच्या हस्ते देण्यात आली.

लष्कर आपले काम सुरू ठेवेल…
काश्मीर प्रश्‍न सोडवण्यासाठी चर्चेद्वारे सरकार प्रयत्न करेल, लष्कर मात्र आपले काम सुरूच ठेवेल. डोकलाम प्रश्‍नावरून भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. सीमेवर सध्या शांतता असल्याचे रावत यांनी सांगितले. चेंगराचेंगरीची दुर्घटना झालेल्या एल्फिन्स्टन रोड तसेच करी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील नवे पादचारी पूल ब्रीज लष्कर बांधणार आहे. एल्फिन्स्टन येथील पूल बांधण्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होईल.