सोयी-सुविधा मिळण्यासाठी नागरीकांचा भुसावळ पालिकेवर मोर्चा

0

मुख्याधिकार्‍यांकडे मांडणे गार्‍हाणे ; सुविधा न पुरवल्यास उपोषणाचा इशारा

भुसावळ- शहरातील जाम मोहल्ला व खडका रोड परीरसरातील सुभाष चौकी जवळील नाला पाण्याने ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी व घाण रस्त्यावर आल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने या भागातील संतप्त नागरीकांनी पालिकेवर मोर्चा काढत मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे गार्‍हाणे मांडले. तातडीने समस्या मार्गी न लागल्यास उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला. समस्या सोडवण्याची प्रसंगी ग्वाही देण्यात आली.

उपवासाच्या काळात अस्वच्छता वाढली
मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू असून त्यानिमित्त असलेल्या उपवासाच्या काळात बांधवांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नाला ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर घाण पाणी आल्याने शहरवासीयांना चालणे कठीण झाले आहे. पालिकेकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त बांधवांनी पालिकेवर मोर्च काढला. शे. रहेमान शे. रहिम यांच्यासह नागरीकांनी समस्या मांडल्या. यावेळी शाहिद रजा यांच्यासह मो.रफिक अब्दुल हकीम, हमीद अली आमीर अली, समीर शेख, अमरीन बी., रेहाना बी. यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.