सोलापूर : ऊसदरासाठी शेतकर्यांचे सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरु असून पंढरपूर, अकलुज तालुक्यात आंदोलन तीव्र झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील बंडीचे गाव इथे अकलुज-सोलापूर ही एसटी पेटवण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांमुळे पुढील अनर्थ टळला. आंदोलकांनी बसच्या काचा फोडून आत पेट्रोल ओतले. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले. ऊसाला 2700 रुपये पहिली उचल देण्याची ऊस उत्पादक शेतकर्यांची मागणी आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्याबाहेरही आंदोलन करण्यात आले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
कारखानदार आणि सरकारचे साटेलोटे
शेतकर्यांच्या ऊसाला योग्य दर मिळायालाच हवा. राज्य सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही. शेतकर्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे. आता आंदोलन शेतकर्यांनी हातात घेतले असून देशद्रोहाचा खटला जरी भरला तरी माघार घेणार नाही. कारखानदार आणि सरकारचे साटेलोटे आहे. सरकारला शेतकर्यांच्या रक्ताचा नैवेद्य हवा आहे काय, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोलापूर येथे केला. सोलापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना टोला
सोलापूर जिल्ह्यात ऊस दरावरून विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बेमुदत उपोषणास बसले आहेत. या पार्श्वभूमीवर तुपकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. कारखानदार आणि लोकप्रतिनिधी यांची अभद्र युती असल्याचा टोलाही त्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे नाव न घेता लगावला. कोल्हापूर, सांगली, सातारा, नंदूरबारचे ऊसदर मार्गी लागले आहेत. पण सोलापूर जिल्ह्यात सरकार कारखानदारांना पाठीशी घालत आहे. त्यांचे कारखानदारांशी साटेलोटे आहे. आजही आम्ही तडजोडीला तयार आहोत. पण सरकार निष्क्रिय आणि सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचे तुपकर म्हणाले.
नगरची पुनरावृत्ती सोलापुरात होईल
तुपकर म्हणाले, जिल्ह्यातील कारखानदार रिकव्हरी कमी दाखवतात, काटा मारतात. सरकारला जबाबदारी टाळून चालणार नाही. कुंपणच शेत खात आहे तर आम्ही बोलायचे कोणाला. कारखानदार कारखाने बंद करण्याची मस्तवाल भाषा करत आहेत. आम्ही आमचा ऊस सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या कारखान्यांना घालू. शेतकर्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे. छातीवर गोळ्या झेलण्यासही ते तयार असून रक्तपात झाला तरी आंदोलन मागे घेणार नाही. नगरची पुनरावृत्ती सोलापुरात होईल, असा इशाराही तुपकर यांनी दिला.