अहमदनगर । सोलर फीडरच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात राज्यातील कानाकोपर्यात शेतकर्यांना वीज उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात शेतकर्यांना स्वस्त आणि खात्रीची वीज उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे आयोजित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते.
फीडरनाच सोलर पॅनेलने जोडणार
फडणवीस म्हणाले, वीज क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने सोलरद्वारे निर्मित वीज फीडरला जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला शेतकर्यांना सौर पंप देण्याची योजना होती. मात्र, सौरपंप वितरित करण्याला मर्यादा असतात, असे लक्षात आल्यावर शेतकर्यांना दिवसा 12 तास खात्रीची वीज देण्यासाठी कृषी पंपांना वीजपुरवठा करणार्या फीडरनाच सोलर पॅनेलने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याची सुरुवात ग्रामविकासाच्या क्षेत्रात मानदंड निर्माण करणार्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णांच्या राळेगणसिद्धी गावातून होत आहे.
माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसंदर्भात कायद्याची ओळख करुन देणार्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सकाळ सोशल फाऊंडेशन, आसरा फाउंडेशन आणि प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने दिवाळीचे महत्त्व सांगणारे एक कोटीहून अधिक संदेश पाठविण्याचा जागतिक विक्रम करण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढील 10 वर्षाचे नियोजन
ऊर्जामंत्री म्हणाले, शेतकर्यांना वीज देण्यासाठी पुढील 10 वर्षाचे नियोजन करण्यात येत असून मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. त्याअंतर्गत गावपातळीवर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने शेतकर्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल. राळेगणसिद्धी येथे सहाशे शेतकर्यांना याचा लाभ होईल. सरपंचांनी आपल्या गावात असा प्रकल्प उभा करण्यासाठी पुढाकार घ्यावा.