जळगाव- जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी येथून नालासोपारा स्फोटके प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या वासुदेव भगवान सूर्यवंशी व विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी या दोघांना मुंबई न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एटीएसने सूर्यवंशी व लोधी यांच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, पेनड्राइव्ह, मोबाइल असे साहित्य जप्त केल्याचे न्यायालयात सांगितले. आज रविवारी दुपारी त्यांना न्यायलायात हजर करण्यात आले होते.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी सर्वात मोठी कारवाई एटीएसने १० ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे केली होती. सनातन संस्थेचा साधक असलेल्या वैभव सुभाष राऊत या तरुणाच्या घरी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कारवाई करून 20 जिवंत बॉम्ब व बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. तेव्हा या प्रकरणाच्या तपासात राज्यभरात धाडसत्रे सुरू केली.
या धाडसत्रांत वैभव राऊतसह शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार यांना अटक करण्यात आली होती. ६ सप्टेंबर रोजी साकळी येथे एटीएसची दोन पथके दाखल झाली व त्यातील एका पथकाने वासुदेव भगवान सूर्यवंशी यास ताब्यात घेतले.
७ सप्टेंबर रोजी गावातील लोधी वाड्यातील विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी (वय 34) यास ताब्यात घेतले होते. चौकशीअंती शनिवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. रविवारी दुपारी या दोघांना मुंबई न्यायालयात हजर केले असता दोघांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींनी मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवण्याचा कट आखल्याचा आरोप एटीएसने केला आहे.
आजवर या दोघांना कोणत्या गुन्ह्यात ताब्यात घेतले याची माहिती कुणालाच एटीएसच्या पथकाने दिली नव्हती. मात्र, आता या दोघांना नालासोपारा स्फोटकेप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या पाच जणांकडून मिळालेल्या माहितीवरून अटक केल्याचे स्पष्ट झाले आहे.