राज्यस्थान। भारतभरामध्ये स्वच्छ भारत मिशन सध्या जोरदार सुरु आहे. पण याच मिशनअंतर्गत काम करणार्या अधिकार्यांनी शौचाला बसलेल्या महिलेचा फोटो काढण्याचा लज्जास्पद प्रकार केला. त्या नंतर याला विरोध करणार्याचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली. राजस्थानमध्ये ‘स्वच्छ भारत अभियानाच्या’वेळी काही अतिउत्साही आणि अतिरेकी सरकारी अधिकार्यांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जयपूरच्या प्रतापगढ येथे हा प्रकार घडला. कच्छी बस्ती मेहताब शाह कॉलनीतील परिसरात सकाळी साधारण सहा ते साडेसहाच्या सुमारास काही महिला उघड्यावर शौचाला बसल्या होत्या. त्यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कारने त्याठिकाणी आले. यावेळी त्यांच्याबरोबर कमल हरिजन, रितेश हरिजन , मनिष हरिजन या तिघांसह नगर परिषदेचे अन्य कर्मचारीही होते.
कोणतेही फोटो काढले नाहीत
आम्ही कोणतीही आक्षेपार्ह छायाचित्रे काढली नाहीत किंवा कोणाला मारलेही नाही. आमच्याशी हुज्जत घालून हा माणूस निघून गेला तेव्हा तो पूर्णपणे व्यवस्थित होता, असा दावा जैन यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी जैन यांचीही तक्रार दाखल करून घेतली आहे. जाफर खान यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच गावकर्यांनी आरोपींच्या अटकेसाठी जिल्हा रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
आरोप फेटाळले
याबद्दल आयुक्त अशोक जैन यांना विचारण्यात आले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून याठिकाणी उघड्यावर शौचाला बसलेल्या लोकांना उठवायला गेलो होतो. आम्ही गाडी पार्क करून त्याठिकाणी असलेल्या लोकांना उघड्यावर शौचाला बसल्यावर होणार्या दुष्परिणामांची माहिती देत होतो. त्यावेळी अचानकपणे एक माणूस आमच्या दिशेने आला आणि त्याने आमच्या कर्मचार्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तो निघून गेल्यानंतरही आमचे काम सुरूच होते. त्यानंतर आम्ही त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलो असता त्याचा मृत्यू झाल्याचे आम्हाला समजले.
पाच जणांविरुद्ध तक्रार
पोलिसांनी या प्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक जैन आणि कमल हरिजन, रितेश हरिजन , मनिष हरिजन यांच्यासह 5 जणांविरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रतापगढ पोलीस ठाण्याचे अधिकारी मंगी लाल बिष्णोई यांनी दिली. दरम्यान, जैन यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.