महापौर भारती सोनवणे यांचा नागरिकांना इशारा ः प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन
जळगाव: जळगाव शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मनपा प्रशासनासह नागरिकांची देखील आहे. मनपा प्रशासनाकडून आपल्यापरीने प्रयत्न करण्यात येत असले तरी ते तोडके ठरत आहे. आम्ही 100 टक्के शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करू. ’माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ हा मूलमंत्र ध्यानी ठेवत प्रत्येकाने शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा, उघड्यावर कचरा टाकणे कायद्याने गुन्हा आहे. तो टाकण्यावर तसेच शहर अस्वच्छता पसरविणार्यावर मनपा प्रशासनाला दंडात्मक कारवाई करावी लागेल, असा इशारा महापौर भारती सोनवणे यांनी दिला आहे.
100 टक्के स्वच्छतेचा प्रयत्न
जळगाव शहर स्वच्छ करण्याचा ध्यास महापौर भारती कैलास सोनवणे यांनी घेतला आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी तीन दिवसांपूर्वी सकाळी अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर मनपा कर्मचार्यांचा उपयोग करून दररोज शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात वॉटरग्रेस आणि मनपा प्रशासनाच्या 840 कर्मचार्यांकडून स्वच्छता मोहीम राबवली जात होती. परंतु तरीही स्वच्छता नसल्याचे चित्र होते. गेल्या दोन दिवसांपासून मनपाच्या केवळ 440 कर्मचार्यांच्या मदतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहर 100 टक्के स्वच्छ करण्यास मनपा प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.
गोलाणीत स्वच्छता मोहीम, चौघांना दंड
शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अँड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नितीन लढ्ढा, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, भाजप गटनेते भगत बालाणी, आरोग्यधिकारी विकास पाटील, शहर अभियंता सुनील भोळे आदी उपस्थित होते. गोलाणी मार्केटमध्ये मोहीम राबविताना चार दुकानदारांना दंड करण्यात आला. इतरांनी लागलीच स्वतःच्या दुकानाबाहेरील कचरा साफ केला. गोलाणी परिसरातून 2 दोन ट्रॅक्टर आणि 1 घंटागाडी भरून कचरा गोळा करण्यात आला.