स्वस्त धान्यासाठी अधिकारी धारेवर

0

भुसावळ शहर व तालुक्यात शंभर टक्के कोट्यानंतरही लाभार्थी मात्र कोरडेच

भुसावळ- शहरासह तालुक्यात स्वस्त धान्य वितरणाचा सावळा-गोंधळ कायम असून ई प्रणालीच्या नावाखाली लाभार्थींना धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याने शहर व तालुक्यातील लाभार्थींनी जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडक दिली. नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर सपकाळे यांना तीव्र शब्दात जाब विचारण्यात आला. शंभर टक्के कोटा आल्यानंतरही धान्य वितरणात अनागोंदी का? असा प्रश्‍न उपस्थित करीत गोदामात धान्याची अफरातफर तर झाली नाही ना? अशी शंका उपस्थित करून लाभार्थींना धान्य वाटप न केल्यास जिल्हा परीषदेसमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला. सुमारे महिनाभरापूर्वीही कुर्‍हे ग्रामस्थांनी तहसील गाठून धान्य वितरण होत नसल्याने संताप व्यक्त केला होता हे विशेष !

जि.प.सदस्यांनी दिला उपोषणाचा इशारा
तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना रास्त भाव दुकानांचे धान्य मिळावे यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून शंभर टक्के नियतन देण्यात आले मात्र तरीही येथील तहसील कार्यालयाकडून ई – प्रणालीच्या नावाखाली हजारो लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात येत असल्यामुळे जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी शेकडो वंचित लाभार्थींसोबत शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडक दिली व संबंधित अधिकार्‍यांना पुन्हा जाब विचारला. तालुक्यातील वंचित लाभार्थींना दोन-तीन दिवसात धान्य न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा दिला आहे. जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर सपकाळे यांना चांगलेच धारेवर धरल्यामुळे तहसील कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली.

कागदपत्रे देवूनही नावांचा समावेश नाही
तालुक्यात अद्यापही ई-प्रणालीची काम अपूर्ण आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये चार-चार वेळेस आधार कार्ड, रेशनिंग कार्ड आदी कागदपत्रे देऊनही लाभार्थींची नावे या ही प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही. तहसील कार्यालयाचा हलगर्जीपणा व कमी मनुष्यबळामुळे हा प्रकार घडत आहे. त्यात जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून मे महिन्यातही शंभर टक्के नियतन देण्यात आले आहे मात्र तरीही दुकानदारांना ई -प्रणालीच्या नावाखाली तहसील कार्यालयातून पुरेसा धान्यपुरवठा करण्यात येत नसल्यामुळे जिल्हा परीषद सदस्या सावकारे यांनी तहसील कार्यालयात पुन्हा धडक दिली. व संबंधित अधिकार्‍यांना शासनाकडून लोकांना धान्यापासून वंचित ठेवण्यात यावे असाच आदेश आला आहे का ? या महिन्याचे शंभर टक्के नियतन आले आहे का ? आले असेल तर ते वाटप करण्यात येत नाही? असे विविध प्रश्न विचारून संबंधित अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. लाभार्थींनी चार-चार वेळेस कागदपत्रे देऊनही त्यांचे ई – प्रणाली मध्ये नावे का टाकण्यात येत नाही ? असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

धान्य गोदामात हेराफेरीचा संशय
शासकीय गोदामात शेकडो क्विंटल धान्याची हेरा फेरी झाली आहे. त्याची भर काढण्यासाठी तर हा प्रकार सुरू नाही ना ? असा प्रश्न पल्लवी सावकारे यांनी उपस्थित केला. तालुक्यातील लाभार्थींना दोन ते तीन दिवसात धान्य न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रसंगी कुर्‍हे पानाचे येथील सरपंच रामलाल बडगुजर, माजी सरपंच सुरेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळी, ग्रामपंचायत सदस्या सुनंदाबाई वराडे यांच्यासह वराडसीम, सुनसगाव व शहरातील पंचशील नगर , वरणगाव, पिंप्रीसेकम आदी परीसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियमानुसार धान्य वितरण -तहसीलदार
स्वस्त धान्य दुकानदारांनी नोंदवलेल्या मागणीनुसार नियमानुसार धान्य वितरण केले जात असल्याचे तहसीलदार महेंद्र पवार म्हणाले. शुक्रवारी कामानिमित्त बाहेर असल्याने नेमके काय घडले? हे सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.