मुंबई : स्वाईन फ्ल्यूने गुजरात आणि महाराष्ट्रातही कहर केला असून २०१५ च्या साथीसारखी बाधितांची आकडेवारी वाढत चालली आहे. गुजरात मध्ये स्वाईन फ्ल्यूने आतापर्यंत २८० जण मृत्युमुखी पडले असून एकूण तीन हजार २२० रूग्णांना या रोगाची लागण झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार १३ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यूने ४०९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि चार हजार ११ जणांना त्याची लागण झाली आहे. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. २०१५ मध्ये महाराष्ट्रात आठ हजार ५३८ स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण होते आणि त्यावेळी ९०३ मृत्यू झाले होते. त्याचवेळी गुजरातमध्ये सात हजार १८० रुग्ण होते तर ५२१ जणांचा मृत्यू झाला होता.
डॉक्टरांच्या मते लोकांनी सार्वजनिक जागांवर जास्त काळजी घेतली पाहिजे. गर्दीची ठिकाणे टाळली पाहिजेत आणि मास्क वापरला पाहिजे. एच वन एन वन विषाणुंविरोधी लस घेतली पाहिजे. स्वाईन फ्ल्यू पेशंटना भेटल्यास स्पर्श टाळला पाहिजे. नाकाला किंवा चेहेऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी साबणाने हात धुतले पाहिजेत.