‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ दिल्लीला रवाना; संसदेला घालणार घेराव

0

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसद घेराव आंदोलनासाठी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वे दिल्लीला रवाना झाली. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातून १२५० हून अधिक स्वाभिमानी कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले आहेत. शुक्रवार ३०नोव्हेंबर व शनिवार १डिसेंबर रोजी दिल्लीतील संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील २१० संघटनांचा सहभाग असून स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

मिरज रेल्वे स्थानकावरून बुधवारी सकाळी १० वाजता ही विशेष गाडी रवाना झाली. या विशेष रेल्वेस १८ डबे असून १५ बोगी, २ जनरल डबे, १ भोजनाची व्यवस्था अशी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ या विशेष रेल्वेची रचना आहे. ‘राजू शेट्टी जिंदाबाद, स्वाभिमानी जिंदाबाद’, यासहीत आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशा घोषणा देत उत्साही वातावरणात विशेष स्वतंत्र रेल्वेतून कार्यकर्ते व शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले.